स्मार्ट मीटरचा “शॉक”:ग्रामस्थ हवालदिल,
दीपक नागले संतापले
राजू सागवेकर/राजापूर –
▪️ तालुक्यात वीजवितरण विभागाने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले असून, यावर शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी वीजवितरण विभागाला निवेदन देऊन ग्रामसभेच्या मंजुरीनंतरच स्मार्ट मीटर बसवण्याची मागणी केली आहे.
▪️ वीजवितरण विभागाकडून सद्यस्थितीतील मीटर फॉल्टी असल्याचे कारण देत नवीन स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवले जात असल्याच्या तक्रारी नागले यांच्याकडे नागरिकांनी केल्या आहेत. यावर नागले यांनी वीजवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून, ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानीपणे हे काम सुरू असल्याचा आरोप केला.
ग्रामीण भागातील समस्यांकडे वेधले लक्ष
▪️ नागले यांनी स्मार्ट मीटर लागू झाल्यास होणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्रामीण भागातील अनेक नागरिक आजही ऑफलाइन पद्धतीने वीजबील भरत असून, ऑनलाईन बिल भरण्यासाठी आवश्यक असलेल्या इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. तसेच अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत, तर वयोवृद्धांसाठी ऑनलाईन पद्धत अवघड ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
आरोग्यसेवेवरही परिणाम होण्याची शक्यता
▪️ नागले यांनी शाळा, शासकीय रुग्णालये आणि कार्यालयांच्या वीजबिलांबाबतही चिंता व्यक्त केली. निधीअभावी बिल थकले, तर स्मार्ट मीटरमुळे वीजपुरवठा तातडीने खंडित होऊ शकतो. आरोग्य केंद्रात वीजपुरवठा खंडित झाल्यास तेथील सेवांवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
स्मार्ट मीटरसाठी ग्रामसभेची मागणी
▪️ स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी प्रत्येक गावातील ग्रामसभेत याबाबत सविस्तर माहिती द्यावी आणि त्यानंतरच मीटर बसवावे, अशी मागणी नागले यांनी केली आहे. प्रशासनाने जनतेच्या हिताचा विचार करून योग्य ती पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Author: Raju Sagvekar
🔴 राजू सागवेकर 🔴 वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702