वाळूबंदीमुळे मोदी आवास घरकुलांची कामे ठप्प – मनसेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

गुहागर – ( संदेश कदम प्रतिनिधि) सध्या सुरू असलेल्या वाळूबंदीमुळे गुहागर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना व शासकीय विकासकामे ठप्प झाली आहेत. या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी कार्यकर्त्यांसह तहसीलदार परिक्षित पाटील यांना निवेदन सादर केले.
वाळूबंदीचा फटका गरजू लाभार्थ्यांना
मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागाने वाळू उत्खनन व विक्री बंद केल्यामुळे मोदी आवास योजनेतील घरकुलांचे बांधकाम ठप्प झाले आहे. गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळण्यासाठी मंजुरी मिळाली असली, तरी वाळूअभावी प्रत्यक्ष काम सुरू करता येत नाही. परिणामी, अनेक कुटुंबांना निवाऱ्यापासून वंचित राहावे लागत आहे.
शासकीय विकासकामांवरही परिणाम
फक्त घरकुलच नाही, तर जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाणी साठवण टाकींची कामे आणि १५व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामेदेखील वाळूअभावी रखडली आहेत. काही ठेकेदार वाळूऐवजी ग्रिटचा वापर करत असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
रोजंदारी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ
वाळू मिळत नसल्याने अनेक मजुरांना काम नाही, परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुढील तीन महिन्यांतच बांधकामे करता येणार असून, त्यानंतर पावसाळ्यामुळे कामे पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे वाळूच्या उपलब्धतेसाठी त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महसूल मंत्र्यांपर्यंत मागणी पोहोचवण्याची विनंती
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन महसूल विभागाने तत्काळ योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच ही मागणी महसूल मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, चिपळूण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी आणि महसूल मंत्री यांना देण्यात आल्या आहेत.















