रिफायनरी बारसूलाच! महाराष्ट्राने हरित प्रकल्प गमावलेला नाही – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई – महाराष्ट्रातील बहुचर्चित बारसू रिफायनरी प्रकल्प होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्याने हरित प्रकल्प गमावल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावले असून, केंद्र आणि राज्य सरकारची ‘सौदी आराम्को’ कंपनीशी प्रकल्पाबाबत बोलणी सुरू असल्याचे स्पष्ट केले.
देशात एकाच ठिकाणी मोठा रिफायनरी प्रकल्प उभारणे कठीण असल्याने, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि केरळ किंवा इतर राज्यांत तीन प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्राकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ‘सौदी आराम्को’ने आंध्र प्रदेश व गुजरातशी बोलणी सुरू केल्याची चर्चा रंगली होती. तसेच केंद्र सरकारनेही प्रकल्प इतर राज्यांत हलवण्याबाबत भूमिका घेतल्याचे बोलले जात होते.
मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही चर्चा फेटाळून लावत बारसू प्रकल्प महाराष्ट्रातच राहील, याची खात्री दिली आहे. तसेच, महाराष्ट्रातील उद्योगस्नेही धोरणामुळे महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.















