विधानभवनाच्या लॉबीतून मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल चोरी – सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मुंबई : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. मात्र, या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल फोन विधानभवनाच्या लॉबीतून चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
कायदे तयार होणाऱ्या आणि राज्याच्या कारभाराचा गाभा असलेल्या विधानभवनाच्या परिसरातच मंत्रीचाच फोन चोरीला जाणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
सुरक्षेवर उठले प्रश्न
विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच विविध मंत्री आणि नेते उपस्थित असतात. अशा उच्च सुरक्षा व्यवस्थेच्या ठिकाणी चोरीसारखा प्रकार घडल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर शंका उपस्थित केली जात आहे.
या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मंत्रीचाच मोबाईल चोरीला जात असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विधानभवनात सुरक्षा वाढवण्याची मागणी
ही घटना समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या सुरक्षेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, या चोरीच्या घटनेबाबत तपास सुरू असून, मंत्री उदय सामंत यांच्या मोबाईलमध्ये काही संवेदनशील माहिती होती का? याचीही चौकशी केली जात आहे. संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन, सुरक्षेच्या उपाययोजना अधिक मजबूत केल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.