विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी ‘जनकल्याण यात्रा’ सुरू

अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या हस्ते शुभारंभ
रत्नागिरी: राज्यभर विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘जनकल्याण यात्रा 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विभागाच्या विविध कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील या यात्रेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशेष सहाय्य विभागाच्या योजनांवर आधारित माहितीपट दिग्दर्शक व निर्माता शंकर बारवे यांनी तयार केला असून, मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे तो दाखविण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना योजनेची माहितीपत्रके देऊन योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने राबवल्या जात आहेत. लाभार्थ्यांना डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा केली जाते. त्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 15 गावांमध्ये आणि शहरांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपटाद्वारे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, राज्य व केंद्र सरकार समाजातील गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारावे लागू नयेत आणि त्यांना थेट मदत मिळावी, यासाठी डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. त्यामुळे भ्रष्टाचार व दिरंगाईला आळा बसला आहे.
राज्यातील गरजू, निराधार, वृद्ध आणि वंचितांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून, जनकल्याण यात्रेच्या माध्यमातून योजनांचा व्यापक प्रसार केला जात आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.