एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा! एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपाने पूर्ण पगार मिळणार
फक्त ५६% पगार मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा; मंगळवारपर्यंत उर्वरित ४४% पगार अदा होणार
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटी म्हणजेच लालपरी हा अत्यावश्यक प्रवासाचा पर्याय आहे. मात्र, या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सध्या गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्च महिन्याचे केवळ ५६ टक्केच वेतन मिळाल्याने घरखर्च, शिक्षण, कर्जहप्ते यांसारख्या गरजा भागवणं कठीण झालं होतं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत, हा प्रश्न मार्गी लावला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवर चर्चा करून हा निर्णय घेतला. सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे थेट आपली व्यथा मांडली होती.
महामंडळाचे दरमहा वेतन खर्च सुमारे २७७ कोटी रुपये इतका आहे. मात्र सरकारकडून मिळालेला निधी २७२ कोटी रुपये असून, त्यातील ४० कोटी थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे केवळ ५६ टक्के वेतन देण्याची वेळ आली होती. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक संकटावर तात्पुरता तोडगा निघाला आहे. पगाराचा मुद्दा मार्गी लागल्याने हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या कुटुंबांवरचं आर्थिक ओझंही काहीसं हलकं होणार आहे.
हॅशटॅग्स:
#एसटीकर्मचारी #पगारसंकट #एकनाथशिंदे #STEmployees #MSRTC #MaharashtraNews #PublicTransport #GraminVahini #STNews #राज्यशासन

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.