१५ ऑगस्ट रोजी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा आमरण उपोषणाचा गंभीर इशारा
धोकादायक झालेल्या जानवळे ग्रा.पं.इमारतीला निधी न मिळाल्यास विनोद जानवळकर आक्रमक
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत इमारत धोकादायक स्थितीत असून हि इमारत कधीही कोसळू शकते व जिवितहानी होऊ शकते याबाबत शासनाने आणि प्रशासनाने दखल घेऊन नवीन इमारतीसाठी त्वरित निधी देण्यात यावा या इमारतीसाठी निधी उपलब्ध न झाल्यास स्वातंत्र्यदिनी दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी पंचायत समिती गुहागर कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला आहे.
यावेळी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की,जानवळे गावातील ग्रामपंचायतीच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली असून इमारत पूर्णपणे हि इमारत पुर्णत: धोकादायक आणि नादुरुस्त झाली आहे. या इमारतीत बसणारे व काम करणारे कर्मचारी व पदाधिकारी जीव मुठीत घेऊन बसतात. पावसाळ्यात तर इमारतीच्या छपरावर प्लास्टिक टाकण्याची वेळ येते. गेली अनेक वर्षे पंचायत समिती गुहागर व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे मागणी करूनही सदर नवीन इमारतीसाठी निधी देण्यात आला नाही.
पंचायत समिती गुहागर फक्त कागदी घोडे रंगवत असून अद्यापही या इमारतीला निधी उपलब्ध होऊ शकला नाही.याची खंत व्यक्त करुन विनोद जानवळकर यांनी सदरची इमारत सध्या धोकादायक बनली असून कधीही इमारत कोसळेल याचा भरवसा नाही. जानवळे ग्रामपंचायत इमारतीबाबत “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” अंतर्गत गुहागर तालुक्यातील मोडकळीस आलेल्या व वापरास धोकादायक झालेल्या इमारती यांचा आढावा घेवून सदर इमारतीचे निर्लेखन करुन मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणे योजनांतर्गत मंजुर करण्यात येईल असे पत्रही पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी यांच्याकडून देण्यात आले होते. परंतु आजतगायत कोणतेही ठोस कार्यवाही या इमारती बाबत झाली नाही तर येत्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी पंचायत समिती गुहागर कार्यालया समोर आमरण उपोषण करीत असल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली.