आपले सरकार’ केंद्रांच्या सेवांवर अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपले सरकार’ केंद्रांच्या सेवांवर अभिप्रायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरु

अहिल्यानगर, दि. १६ – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या अधिसूचित सेवांबाबत नागरिकांचा अभिप्राय घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे ‘अभिप्राय कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.

नागरिकांना विहित शुल्क आकारून व ठराविक मुदतीत सेवा पुरविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधून सेवा सुलभपणे मिळतात का? विहित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारली जाते का ? सेवा मुदतीत मिळतात का ? तसेच केंद्र चालकांकडून नागरिकांना चांगली वागणूक दिली जाते का ? या बाबींवर नागरिकांचा थेट अभिप्राय घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिप्राय कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.



या अनुषंगाने दिनांक १ जुलै २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर अभिप्राय कक्ष कार्यान्वित झाला आहे. सदर कक्षात १० ग्राहक सेवा प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून ते ०२४१-२३१००६१ या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांशी संपर्क साधून अभिप्रायाची नोंद घेत आहेत.

सद्यःस्थितीत महसूल विभागाच्या अधिसूचित सेवांबाबत अभिप्राय नोंदविण्याचे काम सुरू असून लवकरच जिल्हा निबंधक व मुद्रांक विभाग, महानगरपालिका व भू-अभिलेख विभागाच्या सेवांचा समावेशही करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत घेतलेल्या सेवा संदर्भात तक्रार अथवा सूचना असल्यास अधिकृत अभिप्राय कक्षास ०२४१-२३१००६१ या क्रमांकावर कळवाव्यात किंवा देण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करून अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले आहे.

 

——-

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...