ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून.खासगी चालकाना पाचारण करण्याचा महा मंडळाचा विचार …
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. मागण्यांवर अद्याप कोणताच तोडगा निघू न शकल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरुच राहण्याची चिन्हे आहेत. परिणामी, गणेशोत्सवानिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा बसगाड्या आगारांमध्येच विसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतून कोकणात जाणाऱ्या एसटीच्या विशेष जादा बस चालवण्यासाठी एसटी महामंडळखासगी चालकांना पाचरण करण्यात येणार असून, त्यासाठी नियोजन सुरू आहे….
दरवर्षी कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. अन्य शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायीक झालेले असंख्य कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आवर्जून कोकणातील मुळ गावी जातात. त्यामुळे ३ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून जादा बसगाड्या सोडण्यात सुरुवात झाली. यंदा ४,२०० गट आरक्षणासह एकूण ४,९५३ जादा बस पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. यंदा एसटीने पूर्वीचा विक्रम तोडून सुमारे ५००० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. एसटी महामंडळाच्या या बसगाड्या ३ ते ७ सप्टेंबरदरम्यान धावणार आहेत. मात्र, ऐन गणेशोत्सव काळात प्रवाशांची एसटीला मिळालेली पसंती आणि राज्य सरकार, एसटी महामंडळाला कोंडीत पकडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी महामंडळातील ११ कामगार संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली असून या समितीद्वारे कर्मचाऱ्यांचे वेतनाशी निगडीत आर्थिक व महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली जात आहे. मंगळवारपासून धरणे आंदोलन पुकारल्याने राज्यातील ५९ आगारे पूर्णत: बंद होती.
मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून ४ सप्टेंबर रोजी १ हजार ६ बस, ५ सप्टेंबर रोजी ३,५१८ बस, ६ सप्टेंबर रोजी २७६ बस सोडण्यात येणार आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू राहिल्यास, जादा बस चालवणे अवघड होईल. संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी बुधवारपासून दीर्घ काळासाठी करार पद्धतीने चालक व इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी चाचपणी सुरू आहे. याबाबत मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या तीन खासगी संस्थांशी चर्चा सुरू आहे, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
औद्योगिक न्यायालयाने मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाला बेकायदेशीर ठरवले आहे. तसेच या संपात सहभागी झालेल्या संघटना व कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. कामावर रूज होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️