आज हरतालिका व्रत आहे.पार्वती मातेने भगवान शंकरास प्राप्त करण्यासाठी किती

कठीण व्रत आचरिले तसेच आपल्या आराध्य दैवतेविषयी कशी दृढ श्रद्धा होती ते आपण हिंदु म्हणून ही घटना नुसती व्रताच्या दृष्टीने न पाहता एक आदर्श म्हणून पाहावी. आपल्या आदर्शांची ,संस्कृतीची धर्माची जेंव्हा टिंगलटवाळी होतो ती टिंगलटवाळी आपलेच सुशिक्षित लोकच करतात वृत्तपत्रातून , पुस्तकांतून करतात तेंव्हा आपण किमान त्याचा निषेध शब्दांना शस्त्रांची धार देत करावा.
शंकराच्या प्राप्तीसाठी पार्वती तपश्चर्या करीत होती. तिची ती तपश्चर्या अत्यंत उग्र होती. उन्हाळ्यात ती पंचाग्निसाधन करी. हिवाळ्यात गळ्याइतक्या पाण्यात उभी राही. पावसाळ्यात उघड्या आकाशाखाली एखाद्या दगडावर बसून तप करी. तिची परीक्षा पाहण्याकरिता भगवान शंकर बटुवेषाने तिच्याकडे आले. पार्वतीने अतिथी म्हणून त्यांचे स्वागत केले. शंकरांनी आरंभी मधुरपणाने तिच्या प्रकृतीची, परिस्थितीची विचारपूस केली. आणि मग म्हणाले, ‘राजवैभवात सुखाने नांदावे अशी असलेल्या तुझ्यासारख्या कोमल शरीराच्या सुंदर तरुणीने, वानप्रस्थाला शोभावे असे हे कठोर व्रत का आरंभिले आहे?’ पार्वतीने ‘शंकराच्या प्रामेसाठी’ हे केल्याचे सांगताच तो बटू उपहासाने हसला. त्याने शंकराची नानाप्रकारे निंदा केली. त्याच्याशी योग होणे किती विसंगत आणि हास्यास्पद ठरणारे आहे. हे विविध रीतीने समजावून सांगितले. आणि शेवटी तो म्हणाला- ‘उपवर वधूकडून वराविषयी ज्या ज्या काही अपेक्षा असतात त्यातील एक तरी स्मशानवासी भूतनाथाजवळ आहे. का?’
वपुर्विरूपाक्षमलक्ष्यजन्मता ।
दिगंबरत्वेन निवेदितं वसु ।
वरेषु यद् बाल मृगाक्षि मृग्यते ।
तदस्ति किं व्यस्तमपि त्रिलोचने |
‘वर निदान नाकी डोळस नीटस हवा. तुझे डोळे कसे हरिणशावकाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर, मोठे आणि तेजस्वी! आणि तू ज्याच्याकरिता खुळेपणाने अशी घोर तपश्चर्या करते आहेस, तो शंकर मात्र कुरूप डोळ्यांचा. वर कसा कुलीन असावा. याच्या आईबापाचा तर पत्ताच नाही आणि दिगंबर राहतो. तेव्हा संपत्ती किती आहे हे उघडच कळते. ज्याला वस्त्र नेसणे सुद्धा परवडत नाही, त्याची श्रीमंती किती वाखाणावी!’
त्या बटूच्या बोलण्याने पार्वती संतापली. तिने त्याचा प्रत्येक आरोप खोडून काढला. आणि ती थोड्या उपहासाने म्हणाली, ‘तुझ्या या मूर्खपणाच्या बोलण्यात भगवान शंकराविषयी एक गोष्ट मात्र योग्य आणि चांगली सांगितलीस. अरे! ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली अशा ब्रह्मदेवालाही ज्याने उत्पन्न केले, त्याच्या आईबापाचा ठावठिकाणा नसेल यात काय नवल आहे? जो अनादि, अनंत आहे, त्याचे कुल न सांगता येणे अगदी स्वाभाविक आहे.’ आणि नंतर ती आपल्या सखीकडे वळून म्हणाली- ‘सखे! या बटूला आता आश्रमाच्या बाहेर काढ. पुन्हा बोलण्यासाठी त्याचे ओठ फुरफुरू लागले आहेत. तो असेच काहीतरी वेडेवाकडे बोलणार. अगं! शास्त्र असे आहे की थोरांची जो निंदा करतो, त्यालाच केवळ पाप लागत नाही तर ती निंदा ऐकून घेणाराही पापी ठरतो.
संदर्भग्रंथ : कुमारसंभव : महाकवि कालिदास
आत्मसंयमयोग : पू.स्वामी वरदानंद भारती
उमापती महादेव की जय
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
दत्त माझा मी दत्ताचा फेसबुक ग्रुप वरून साभार🙏

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️