मुंबईत जोरदार पाऊस; लोकल ट्रेन सेवा विस्कळीत, सखल भागांत पाणी साचले
नवी मुंबई (मंगेश जाधव)
रायगड, रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारारविवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी पहाटेपासून वाढला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगर परिसरात सकाळपासूनच मुसळधार सरी कोसळत असून शहरात अंधाराचे वातावरण आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, पुणे व घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
शहराच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन सेवांवर पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत, तर हार्बर मार्गावर 5 ते 10 मिनिटांचा विलंब होत आहे. पश्चिम रेल्वेमार्ग अद्याप सुरळीत आहे. अंधेरी सबवे परिसरात दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करून ती गोखले ब्रीजमार्गे वळविण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.
सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दादर, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदमाता चौक येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आठवड्याचा पहिला दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर चाकरमानी घराबाहेर पडत आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यातही गेल्या काही तासांपासून जोरदार पावसाच्या सरी सुरू असून ठाणे आणि नवी मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे.















