मच्छीमारांसाठी दिलासा; १२ नॉटिकल मैलबाहेर खोल समुद्रात मासेमारीला केंद्राची परवानगी
रत्नागिरी – पावसाळ्यात वादळी वारे, हवामान खात्याचे धोक्याचे इशारे आणि त्यामुले सतत बंद राहणारी मासेमारी यामुळे मच्छीमारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. अनेकदा समुद्रात गेलेल्या नौकांना पुरेशी मासळी मिळत नसल्याने हंगाम कोराच ठरत होता.
अशा कठीण काळात मच्छीमारांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सागरी विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजेच राज्याच्या अखत्यारीबाहेरील १२ नॉटीकल मैलबाहेरच्या समुद्रात यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या भागात मासेमारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४,१०२ मासेमारी नौका असून त्यापैकी ३,५१९ नौका या यांत्रिकी आहेत. या सर्व नौकांना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खोल समुद्रात मासेमारी करण्याची मुभा मिळणार आहे.
केंद्राच्या नवीन नियमानुसार, यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी थेट केंद्र शासनाची परवानगी घेता येईल. यामुळे जानेवारी ते मे या काळात परवानगीच्या मुद्द्यावरून मत्स्य व्यवसाय विभाग आणि मच्छीमार यांच्यात होणारा वाद संपण्याची शक्यता मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाच्या सुधारित अधिनियमानुसार, याच काळात केंद्राच्या अखत्यारीतल्या समुद्रात मासेमारी करून राज्याच्या समुद्रातून जेटीवर परतणाऱ्या नौकांवर कारवाई होत होती. नव्या नियमांमुळे ही कारवाई टळणार असून मच्छीमार नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नवीन नियमावलीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवरील दंडात्मक कारवाईची रक्कमही तुलनेने कमी ठेवण्यात आली आहे. तसेच केंद्राच्या समुद्रात मासेमारीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याने परवानगी वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.
रत्नागिरीतील मच्छीमार नेते विकास धाडस, नासीर वाघू आणि नुरूद्दीन पटेल यांनी केंद्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करून हा निर्णय मच्छीमारांसाठी दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया दिली.















