Big Breaking…
मुंबई महापौरपदावर अडीच वर्षांचा दावा? शिंदेंचा ‘हॉटेल डाव’ चर्चेत
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महापौरपदावरून राजकीय घडामोडी रंगल्या आहेत. भाजपने ८९ वॉर्ड जिंकत सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या, तरी बहुमतासाठी आवश्यक ११४ नगरसेवकांचा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची साथ अनिवार्य ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महापौरपदासाठी अडीच वर्षांचा दावा टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत शिवसेनेला अडीच वर्षांसाठी महापौरपद द्यावे, अशी भावनिक साद शिंदे गटाकडून भाजपसमोर मांडली जाऊ शकते. याशिवाय स्थायी समितीचे अध्यक्षपद व सदस्यपदांवरही शिंदे सेनेकडून दावा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९, शिंदे सेनेचे २९, ठाकरे गटाचे ६५ आणि मनसेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी भाजपला शिंदे गटाची साथ घ्यावीच लागणार असल्याने, या संख्याबळाची जाणीव ठेवूनच शिंदे यांनी आपला डाव टाकल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी काल त्यांच्या सर्व २९ नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून घेतले. सत्तास्थापना होईपर्यंत नगरसेवकांना येथेच ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. या ‘हॉटेल राजकारणामुळे’ शिंदे काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. वरच्या देवानेच ठरवले आहे की महायुतीचाच महापौर होईल. शिंदे साहेब आणि आम्ही एकत्र बसून सगळे ठरवू.” नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावर ते म्हणाले, “आम्ही जसे आमचे नगरसेवक एकत्र बोलावले, तसेच शिंदेंनीही केले असेल. आता पळवापळवीची गरज नाही.”
महापौरपदाचा तिढा कसा सुटतो आणि भाजप-शिंदे सेना यांच्यात नेमका काय तोडगा निघतो, याकडे आता संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.















