दिवा परिसरातील धाबे बनलेत ‘ओपन बार’; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
विशेष प्रतिनिधी /अरविंद कोठारी
दिवा: दिवा शहर आणि परिसरातील अनेक धाब्यांवर सध्या खुलेआम दारूची विक्री आणि सेवन सुरू असून, हे धाबे आता जणू ‘ओपन बार’ बनले आहेत. यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, या बेकायदेशीर प्रकारावर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क (State Excise) विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.
फॅमिली धाब्यांच्या नावाखाली दारूच्या पार्ट्या
दिवा परिसरातून जाणारे रस्त्यांलगत अनेक छोटे-मोठे धाबे आणि हॉटेल्स थाटण्यात आले आहेत. मूळतः ‘फॅमिली रेस्टॉरंट’ किंवा साध्या जेवणाचे ठिकाण म्हणून सुरू करण्यात आलेल्या या धाब्यांवर आता सर्रासपणे दारूच्या पार्ट्या रंगताना दिसत आहेत. सायंकाळ होताच या ठिकाणी मद्यपींची मोठी गर्दी उसळते. अनेक धाबा चालक स्वतः ग्राहकांना छुप्या मार्गाने दारू उपलब्ध करून देतात किंवा बाहेरून आणलेली दारू पिण्यासाठी जागा, ग्लास आणि ‘चकणा’ पुरवतात. हा प्रकार नियमांचे थेट उल्लंघन करणारा असूनही राजरोसपणे सुरू आहे.
या धाब्यांवर दारू प्यायल्यानंतर मद्यपींचा गोंधळ, अर्वाच्य शिवीगाळ आणि हाणामारीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. यामुळे कुटुंबासह बाहेर पडणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिला आणि लहान मुलांना या मार्गावरून जाताना असुरक्षित वाटते. शिवाय, रात्रीच्या वेळी मद्यपान करून वेगाने वाहने चालवणाऱ्यांमुळे अपघातांचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिसरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न या मद्यपींमुळे ऐरणीवर आला आहे.यामुळे महिलांना आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
*प्रशासनाचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष?*
सर्वांत संतापजनक बाब म्हणजे, हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. प्रशासनाच्या कथित ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळेच धाबा चालकांचे फावले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. संबंधित विभागांचे अधिकारी या धाब्यांची साधी तपासणीही करत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.
*दिवा शहर आणि परिसरातील सर्व धाब्यांची प्रशासनाने ‘सरप्राईज चेकिंग’ (अचानक तपासणी) करावी*.
ज्या धाब्यांवर बेकायदा दारू विक्री आणि सेवन सुरू असेल, त्यांचे परवाने तत्काळ रद्द करून चालकांवर गुन्हे दाखल करावेत.अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.














