Mumbai–Goa Highway कामात दिरंगाई; दोन ठेकेदारांना १६ कोटींचा दंड
आरवली–काटे आणि काटे–वाकेड टप्प्यात संथगती; सरकारचा कडक इशारा
रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांमध्ये निर्माण झालेला संताप अखेर सरकारी कारवाईतून व्यक्त झाला आहे. कामाची मुदत न पाळणे, वारंवार सूचना देऊनही गती न वाढवणे आणि प्रवाशांना खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करायला लावणे या कारणांवरून दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांवर एकूण १६ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आरवली ते काटे या ३९ किलोमीटरच्या टप्प्याचे काम करणाऱ्या एचएमपीएल कंपनीवर ११ कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ३११ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. वारंवार सूचना देऊनही अपेक्षित सुधारणा न झाल्याने रस्ते विकास विभागाने कंपनीच्या बँक गॅरंटी किंवा देयकातून ११ कोटी रुपये कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, काटे ते वाकेड या ४९ किलोमीटरच्या टप्प्यासाठी ५१९ कोटी रुपयांचे कंत्राट मिळालेल्या इगल कंपनीवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कामाची प्रगती समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरकारने ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवाईमुळे महामार्गाच्या इतर टप्प्यांवर काम करणाऱ्या कंत्राटदारांनाही स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. कामात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही, तसेच वेळेत काम पूर्ण न केल्यास मोठी आर्थिक कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.
महामार्गाच्या कामाला आता तरी वेग मिळून प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











