फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह
रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
वाटद मिरवणे ग्रामपंचायत येथील प्रलंबित तक्रारी, माहिती अधिकार अर्ज तसेच विविध नागरिकांच्या प्रश्नांबाबत दिनांक २२ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्हदरम्यान ग्रामविकास अधिकारी श्री. राजकुमार पिराजी प्रक्षाळे तसेच सरपंच (प्रशासक) अमित वाडकर अनुपस्थित राहिल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे मुख्य जिल्हा संपर्क प्रमुख (रत्नागिरी) व पत्रकार श्री. निलेश वि. रहाटे यांनी दिनांक ९ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी पत्र देऊन फेसबुक लाईव्ह संदर्भात पूर्वसूचना दिली होती. तसेच या संदर्भातील प्रती वरिष्ठ प्रशासनालाही देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष लाईव्हच्या वेळी संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व प्रश्नांना अधिकृत उत्तर मिळू शकले नाही.
रहाटे च्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर २०२५ पासून विविध विषयांवर ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्याकडे तक्रारी व विनंती अर्ज सादर करण्यात आले होते . या अर्जांच्या प्रती वरिष्ठ कार्यालयांनाही देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक प्रकरणे अद्याप प्रलंबित असून त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच ग्रामविकास अधिकारी हे जन माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असताना माहिती अधिकार कायद्यानुसार मागवलेली माहिती वेळोवेळी व योग्य प्रकारे उपलब्ध करून दिली जात नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही माहिती न पुरवल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, वाटद मिरवणे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कथित गैरप्रकार, चुकीची कामे व घोटाळे दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांची बदली करून ग्रामपंचायतीसाठी सक्षम व निष्पक्ष ग्रामविकास अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येणार आहे.
या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून वरिष्ठ प्रशासन याची दखल घेणार का, कि नेहमी प्रमाणे तक्रार केली कि वरिष्ठ चे हात आपल्या अधिकारी च्या डोक्यावर असतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत निलेश रहाटे यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा केली असता ग्रामविकास अधिकारी रजेवर असल्याचे समजले. मात्र फेसबुक लाईव्ह संदर्भातील अर्ज मी ९ मे २०२६ रोजीच दिला होता व त्याच्या प्रती गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी मार्गी लागाव्यात म्हणून लाईव्ह आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे संबंधित ग्रामविकास अधिकारी रजेवर जाणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना मला देण्यात आली नाही. असे असताना संबंधित अधिकाऱ्यांची रजा मंजूर कशी करण्यात आली, याबाबत ही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे.”














