सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार
: वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेवकांची भरती होणार; ग्रामीण-नागरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर
मुंबई : शिवसेनाप्रमुख Bal Thackeray यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी व ग्रामीण लोककल्याण अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेवकांची तब्बल ८ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत.
२३ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे. अभियानाअंतर्गत राज्यभर ३५१ ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे उभारली जाणार असून, २६ ठिकाणी पॉलिक्लिनिकची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच ३१ ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत.
याशिवाय सर्व आरोग्य संस्थांमध्ये रुग्ण कल्याण समित्या स्थापन केल्या जाणार असून नागरी आरोग्य संस्थांमध्ये सुमारे ११ हजार महिला आरोग्य समित्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील १ हजार ९५८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १० हजार ७८८ उपकेंद्रांमध्येही हे अभियान राबविले जाणार आहे.
आरोग्य विभागाने सर्व १३ प्रकारच्या आरोग्य सेवा नियमितपणे उपलब्ध करून त्यांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ६३ प्रकारच्या तपासण्या, तर उपकेंद्रांमध्ये १४ प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच ३० वर्षांवरील महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हाइकल कॅन्सर, ओरल कॅन्सर आणि मेनोपॉज संदर्भातील समस्यांच्या वार्षिक तपासण्या केल्या जाणार आहेत.
जनआरोग्य योजनेचा लाभ वाढविण्यावर भर
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana अंतर्गत शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण सध्या १७ टक्के असून ते ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच ९ कोटी ७४ लाख रेशनकार्डधारकांपैकी सध्या केवळ ३ कोटी ९४ लाख लाभार्थ्यांची आयुष्मान भारत कार्डे तयार झाली आहेत. ही संख्या ७ कोटी ३० लाखांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य अभियानातून निश्चित करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांनी सांगितले की, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून हे अभियान जाहीर करण्यात आले असून, राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.”















