दापोली कृषि विद्यापीठात जाणीव जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम संपन्न
दापोली : (वार्ताहर) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीतील संशोधन कार्य हे शेतकरी वर्गापर्यंत पोहोचणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी यांनी बोलताना व्यक्त केले.ते आदर्शगाव विरसई येथील कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थिनींच्या कृषी नित्या आणि वसुंधरा गटाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी श्री. दळवी यांनी विद्यापीठामध्ये कृषी अंतर्गत होणारे सर्व संशोधनकार्य शेतकऱ्यापर्यंत पोहचले आणि ग्रामीण शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली तरच येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ होईल व येथील स्थानिक वर्ग नोकरीसाठी शहरांमध्ये न जाता इथेच थांबण्यास मदत होईल. त्यासाठी शाश्वत विकास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती केल्यास येथील लोकांचे अर्थाजन चांगल्या प्रकारे होईल असेही सांगितले. तसेच त्यांनी यावेळी ग्रामीण भागातील मुलींना विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आवाहन केले. कारण विद्यापीठातील अनेक विद्यार्थी विविध परीक्षांमधून अधिकारी वर्ग झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
आदर्शगाव विरसर्ई बद्दल बोलताना ते म्हणाले की या गावातील सर्व ग्रामस्थांची असणारी एकी व सहकार्याची भावना यामुळेच या गावाने माझी वसुंधरा ४.० यासह अनेक शासनाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. येथील महिलांना आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी यासाठी फळ प्रक्रियावर आधारित प्रशिक्षण विद्यापीठ अंतर्गत राबवणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. तसेच ग्रामपंचायत अधिकारी विरेश कदम व त्यांचे सर्व सहकारी यांचे वसुंधरा अभियानातील पुरस्काराबाबत विशेष कौतुक करून माझी वसुंधरा अभियान ५.० या साठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.पराग हळदणकर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.मकरंद जोशी, कृषी पर्यवेक्षक विनोद म्हस्के, कृषी सहाय्यक स्नेहल रहाटे, वनस्पती शास्त्र विभागाचे डॉ. उदयकुमार पेठे, उद्यान विद्या विभागाचे डॉ.महेश कुलकर्णी, वनस्पती रोग शास्त्र विभागाचे तज्ञ डॉ. राजेश भागवत, विशेष तज्ञ विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. रणजीत महाडिक, कीटकशास्त्र विभागाचे बापूसाहेब शंदे, कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रवीण झगडे, डॉ.मंदार पुरी, सरपंच मनोरमा राणे, ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष कृष्णा राणे, सचिव अनिल पिंपळकर, उपसरपंच विद्यार्थ्य जाधव,माजी सरपंच सुरेश वडतकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष हरि राणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी, पत्रकार अजित सुर्वे, चेतन राणे, ग्रामस्थ, महिला, कृषी नित्या व वसुंधरा गटाच्या विद्यार्थिनी, विरेश्वर विद्यालयाचे शिक्षकवृंद, जिल्हा परिषद आदर्श शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.















