रत्नागिरी – भास्कर जाधव यांच्या रूपाने केवळ एक जागा महाविकास आघाडीला मिळाली असली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी चार जागा मिळवण्यात महायुतीला यश आले आहे, . राजापूर मतदारसंघातून निवडून आलेले किरण सामंत हे विधिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन चेहरा ठरले आहेत.
जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, गुहागर रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी दापोलीतून योगेश कदम, रत्नागिरीमधून उदय सामंत आणि राजापूरमधून किरण सामंत यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. गुहागरमधून भास्कर जाधव यांनीही सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले होते, तर चिपळूण मतदारसंघात शेखर निकम आणि प्रशांत यादव यांच्यात शेवटपर्यंत चुरस होती; मात्र शेवटच्या पाच ते सात फेऱ्यांमध्ये शेखर निकम यांनी आघाडी घेत प्रशांत यादव यांना मात दिली.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात आपल्या तडफदार वक्तृत्व शैलीने आणि भारदार आवाजाने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणारे भास्कर जाधव यांनी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात प्रचाराचा झंझावात लावला होता. जिल्हा पिंजून काढला होता; मात्र त्यांना आपली एकच सीट मिळवण्यात यश आले आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचे आणि महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी राजेश बेंडल यांना उमेदवारी देत भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा डाव आखला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. बेंडल यांना क्रमांक दोनची ६७,८३८ की मते मिळाली. भास्कर जाधव यांनी आपल्या भोवती रचलेल चक्रव्यूह भेदून विजयी होणारच असा छातीठोक केलेला दावा खरा करून दाखवला आहे. त्यामुळे उदय सामंत यांना एका मतदारसंघात मार खावा लागला आहे.
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील अजित पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार शेखर निकम यांनाच जनाधार मिळाला आहे. अखेर अटीतटीच्या निवडणुकीत शेखर निकम यांनीच बाजी मारली आहे. त्यांना ९१,९१७ इतकी, तर प्रतिस्पर्धी प्रशांत यादव यांना ८५,७४५ इतकी मते मिळाली. काळजात धडकी भरवणारा हा निकाल लागला. निकम यांच्यापेक्षा प्रशांत यादव प्रचारात वरचढ ठरले होते. प्रशांत यादव यांनी शेवटच्या काही दिवसात प्रचारात मारलेली मुसंडी वाखाणण्याजोगी होती. या मतदारसंघात प्रशांत यादवच विजयी होणार असे आखाडे बांधले होते. यामुळे शेखर निकम यांना जेरीस आणले होते. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल याकडे दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. शेवटी शेखर निकम यांनी बाजी मारत आपला गड कायम राखला आहे. निकम यांच्या विजयाने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख ११ हजार ३३५ मते मिळवून उदय रवींद्र सामंत हे विजयी झाले, तर ते प्रतिस्पर्धी बाळ माने यांना दुसर्या क्रमांकाची ६९ हजार ७४५ इतकी मते मिळाली. पहिल्या फेरीपासूनच सामंत हे आघाडीवर होते. निवडणूक निर्णय अधिकारी देसाई यांनी मतमोजणीनंतर सर्वाधिक मते मिळालेल्या सामंत यांना विजयी घोषित केले. यानंतर त्यांनी प्रमाणपत्र आणि बुके देऊन त्यांचे अभिनंदन केले.
दापोली मतदारसंघातून योगेश कदम यांना एकूण १ लाखाहून अधिक मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी उमेदवार संजय कदम यांना मते ७९, ९४४ मते मिळाली. त्यामुळे २४०९३ इतक्या मताधिक्यांनी योगेश कदम विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दापोली डाॅ.अजित थोरबोले यांनी घोषित केले.
राजापूर मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेले महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी विद्यमान आमदार राजन साळवी यांना २० हजारांच्या धूळ चारली. किरण सामंत यांनी ८०,२५६, तर प्रतिस्पर्धी उमेदवार राजन साळवी यांनी ६०, ५७९ इतकी मते घेतली. राजापूरमध्ये येणारा प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचे आणि त्या बदल्यात प्रदूषणविरहित कारखाने,प्रकल्प आणण्याचे आश्वासन देणाऱ्या किरण सामंत यांच्यावर राजापूरकरांनी विश्वास दाखवला.
विजयी उमेदवार, मिळालेली मते आणि कंसात मताधिक्य
योगेश कदम – १,०५,००७ (२३९१६)
शेखर निकम – ९१,९१७ (६१७२)
भास्कर जाधव – ७०,४३० (२५९२)
उदय सामंत – १,११,३३५ (४१५९०)
किरण सामंत – ८०,२५६ (१९९९४)
⭕आ. भास्कर शेठ जाधव यांचा विजय 👇https://youtu.be/6Al5vg5me8g?si=5INEHFOeaT_HwMGn

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.