निवडणूक आयोगाने काँग्रेसला भेटीसाठी बोलावले
दिल्ली--महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया २३ नोव्हेंबरला पार पडली. राज्यात लागलेल्या निकालानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. शिवाय अनेक उमेदवारांनी आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती. काँग्रेसकडूनही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. यानंतर आता या मागणीला केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.
मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रियेचे पालन केले जाते, हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला ३ डिसेंबर रोजी भेटण्यासाठी आमंत्रित केले आहे. महाराष्ट्र निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीबाबत त्यांची चिंता, हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम प्रक्रियेबाबत काही शंका अशा सर्व बाबींवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे
मतदान पॅनेलने म्हटले आहे की, ते काँग्रेसच्या सर्व कायदेशीर चिंतांचे पुनरावलोकन करेल आणि पक्षाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून लेखी प्रतिसाद देखील देईल. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI), काँग्रेसला आपल्या अंतरिम प्रतिसादात, प्रत्येक टप्प्यावर उमेदवार किंवा त्यांच्या एजंट्सच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रिया असल्याची पुष्टी केली. मतदारांच्या मतदानाच्या आकडेवारीबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना, आयोगाने असे सांगितले की मतदारांच्या मतदानाच्या डेटामध्ये कोणतीही तफावत नाही.
काँग्रेसने शुक्रवारी आरोप केले होते की, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेशी गंभीरपणे तडजोड केली जात आहे आणि निवडणूक आयोगावर टीका केली. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आणि पक्षाने सांगितले की ते ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय चळवळ सुरू करणार आहेत. यानंतर आता निवडणूक आयोगानेचं थेट काँग्रेसला त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी बोलावले आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.