मुंबई अपघातग्रस्त नौका मालकाला साडेअठरा लाख रुपयांची नुकसान भरपाई
मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश.
मुम्बई -२८ डिसेंबर रोजी मुंबई समुद्रात घडलेल्या एका दुर्घटनेत हेमदीप टिपरी यांच्या मालकीच्या तिसाई नावाच्या मासेमारी नौकेला चीनमधील मालवाहतूक जहाजाने धडक दिली होती. या अपघातात जीवितहानी टळली असली तरी तिसाई नौकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. स्थानिक परवाना अधिकारी, सागरी पोलीस, बंदर निरीक्षक, आणि मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यानुसार, नौकेचे नुकसान सुमारे १८.५५ लाख रुपयांचे असल्याचे निष्पन्न झाले.
मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने नुकसान भरपाईसाठी संबंधित जहाज कंपनी आणि अपघातग्रस्त नौका मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चीनमधील मालवाहतूक जहाज कंपनीने नुकसान भरपाई देण्यास सहमती दर्शवली. यानंतर, नुकसान भरपाई म्हणून १८.५५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नौका मालक हेमदीप टिपरी यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे, मंत्रिमंडळातील अन्य सदस्य, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त पंकज कुमार, सहआयुक्त महेश देवरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
ही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मच्छीमार समाजाने त्यांचे विशेष आभार मानले असून या घटनेने मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील अपघातग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.