राजापूर नगर परिषदेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी देण्याची नागरिकांची मागणी
राजापूर नगर परिषदेसह सर्वच शासकिय कार्यालयातील बहुतांशी पदे रिक्त असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढच , शासनाचा १०० दिवसांचा कार्यक्रमही राजापूरात अपयशी
राजापूर / प्रतिनिधी – पुरुषोत्तम खांबल
गेल्या तीन वर्षापासुन रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे राजापूर नगर परिषदेवर असणारे प्रसासकिय राज्य आणि त्यातच गेल्या सहा महिण्यापासुन कायम स्वरुपी न मिळालेले मुख्याधिकारी यामुळे राजापूर शहरातील नागरिकांच्या समस्यानी उचांक गाठला आहे . छोट्या छोट्या कामांसाठी सततच्या माराव्या लागणाऱ्या चकरांमुळे राजापूरकर चांगलेच मेटाकुटीस आले असुन राजापूर नगर परिषदेवर कायम स्वरुपी मुख्याधिकारी द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे .
आरक्षणाच्या तिढ्यामुळे गेली तीन वर्ष राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या असुन याचा फटका राजापूर नगर परिषदेलाही बसलेला आहे . गेली तीन वर्ष राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे राजापूर नगर परिषदेचा कारभार सद्या प्रशासक नेमुन हाकला जात आहे . राजापूरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे सध्या राजापूर नगर परिषदेचा प्रशासकिय कारभार देण्यात आलेला आहे . त्यातच राजापूरचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची १६ सप्टेंबर २०२४ रोजी बदली झाल्यानंतर राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त झाले आहे .
सध्या राजापूर नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे देण्यात आलेला आहे . मात्र रत्नागिरी नगर परिषद सांभाळुन आठवड्यातला एखाददुसरा दिवस ते राजापूर नगर परिषदेला देत असले तरी सद्या शहरात सुरु असणारी विकासकामे , नागरिकांचे प्रश्न , कर वसुली , पाण्याचे व स्वच्छतेचे प्रश्न , बांधकामे असे अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत .
राज्यशासनाने प्रशासनाला शंभर दिवसांचा कार्यक्रम देताना नागरिकाना त्रास होवु नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरी शासन स्तरावरुनच महत्वाची पदे भरली जात नसल्याने इतर अधिकारी कर्मचारी हा कारभार हाकणार तरी कसा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . परिणामी नागरिकाना आपल्या कामांसाठी विविध कार्यालयांचे उंबरठे सातत्याने झिजवावे लागत आहेत . राजापूर नगर परिषदेलाही कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबुन पडली आहेत .
आठवड्यातुन एकदा किंवा दोनदा येणारे प्रभारी मुख्याधिकारी पाहता येणाऱ्या अर्जांवर सह्या होवुण आदेश होण्यासाठी नागरिकाना एका आठवड्याहुन अधिक काळ प्रतिक्षा करावी लागत आहे . तरी शासनाने राजापूर नगर परिषदेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे .
चौकट –
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजापूरकरानी भाकरी परतली खरी तरी अनेक शासकिय कार्यालयातील रिक्त पदे मात्र तशीच कायम आहेत . राजापूर तालुक्यातील सर्वच शासकिय कार्यालयातील अनेक पदे ही अद्यापही रिक्त असल्याने अनेक समस्या मात्र कायम आहेत . तालुक्याच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या नागरिकाना आपल्या कामांसाठी या रिक्त पदांच्या कार्यालयांचे उंबरठे सातत्याने झिजवावे लागत असल्याने तालुकावासियान्मधुन नाराजीचा सुर उमटत आहे .

Author: Purushottam Khambal
पुरुषोत्तम खंबल. 🔴 डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर 🔴 धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी