कंत्राटी शिक्षक भरती रद्द!, नियमित शिक्षक मिळणार
मुंबई: राज्य सरकारने शिक्षक भरतीसंदर्भात एक शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार आता सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड, बीएडधारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने या शाळांमध्ये आता नियमित शिक्षक शिकवणार आहेत.
राज्यातील सरकारी शाळा जिथे १० किंवा १० पेक्षा कमी पटसंख्या होती, त्या शाळांमध्ये बीएड आणि डीएडधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये शासन निर्णय काढण्यात आला होता. खरे तर नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून सरकारने हा शासन निर्णय जाहीर केला होता.
२०२२ सालच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणा-या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. याच कारणामुळे २०२४ च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल, असा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला.
कंत्राटी शिक्षक भरती रद्द!, नियमित शिक्षक मिळणार

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.