मानवतेचे पुजारी निष्काम कर्मयोगी
संत गाडगेबाबा…
संत गाडगेबाबा एक निरक्षर मनुष्य. रंजल्या गांज |ल्या लोकांनाच नाही तर मूक पशुपक्षांना आपल्या उबदार बाहुपाशात घेणारे एक महासेवक तसेच धरतीच्या लेकरांवर प्रेमाचे पांघरून घालणारे महामानव. गाडगेबाबांनी स्वच्छतेचा वसा अंगिकारला होता त्यांची आई सखूबाई भल्या पहाटे उठून दळण दळायची यावेळी आईजवळ झोपलेला डेबू जागा व्हायचा कान देवून ओव्या ऐकायचा दळणानंतर आई सारा वाडा झाडून लख्ख करायची स्वच्छ्ता हेच घराचे भूषण हा संस्कार बालपणीच डेबुजीला आईकडून मिळाला मोठेपणी हातात खराटा घेवून लोकांच्या पायाखालील जमीन रस्ते स्वच्छ करण्याचे बाळकडू आईकडून मिळाले घरदार स्वच्छ असेल तर मन देखील स्वच्छ राहते हा आईचा शब्द डेबूजीने आयुष्यभर सांभाळला त्यांच्या जीवनावर संस्कार करणारे आई हे पहिले विद्यापीठ होते.
१ फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी संसाराचा त्याग करून सर्वाच्या सुखासाठी घर सोडले दिवसभर लोकांची कामे करायची मिळेल ते खायचे एखाद्या मंदीराजवळ किंवा झाडाच्या आडोशाला जावून झोपायचे व रात्री किर्तन करायचे डेबूजींनी आपल्या भ्रमंतीत अनुभवाची शिदोरी मिळविली अनुभव हा खरा गुरु त्याने शिकविलेले पाठ खरे हे त्यांना कळून चुकले होते. डेबूजींनी समाज विकासाची सुरुवात ऋणमोचन पासून केली ऋणमोचनला पौष महिन्यात यात्रा भरत असे लोक मुगदलेश्वराच्या यात्रेसाठी येत असत पूर्णा नदीत स्नान करीत देवाला पाणी घालीत असत त्यामुळे नदीकाठावर चिखल होत असे लोक चिखलात पडत असत त्यांना बघणारे त्यांना हसत असत गाडगेबाबांनी हे सर्व पाहून हातात स्वतः कुदळ घेवून पूर्णा नदीवर पायऱ्या बनविण्यास सुरुवात केली स्वतः एकटेच दरड खणू लागले हे पाहून काही लोक त्यांना हसू लागले तर काही बाबांना मदत करू लागले व बघता बघता तेथे अनेक हातांच्या सहकार्याने पायऱ्या तयार झाल्या मग सर्व परिसर झाडून स्वच्छ केला व रात्री किर्तनातून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. “लोकसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे” हे लोकांना पटवून दिले.
॥ पार्था जया चिया ठायी। वैषम्याची वार्ता नाही। रिपु मित्र दोही l सरिसा पाडू ॥ जो खांडावया घाव घाली।। की जयाने लावणी केली। दोघा एकाचे सावली। वृक्ष दे जैसा ॥
हा भाव मनी बाळगूनच बाबा काम करीत असत झाडावर कुऱ्हाड चालविणाऱ्यास आणि त्या झाडास पाणी घालणाऱ्यास वृक्ष सारखीच सावली देत असतो मग आपले आप्त व इतर यांना वेगवेगळी वागणूक देणे बाबांना रुचले नाही. बाबांनी स्वतः पासूनच निःस्पृहतेचा पाठ गिरविला बाबांची ही निःस्पृहता पाहून कोणी त्यांच्या कुटूंबियांना डाळ, तेल, धान्य, वस्त्रे दिलीत तर बाबा ते सर्व सामान मजुरांना वाटीत असत आजच्या युगात अभी निस्पृहता दुर्मिळ गोष्ट बनली आहे.
बाबांनी महाराष्ट्र पालथा घातला समाज जीवनाचे अवलोकन केले एक अक्षर न शिकलेल्या बाबांनी जगातल्या पाठशाळेतून ज्ञान घेतले सडकेवरच्या शाळेत बाबा जीवनाचे पाठ शिकले त्यामुळे परंपरा, प्रथा, अंधश्रध्दा आणि रूढीग्रस्त समाज बदलून टाकण्याचे काम बाबांनी हाती घेतले किर्तन त्याचे माध्यम ठरविले बाकीच्या किर्तनकारा प्रमाणे बाबांनी माया, ब्रम्ह, स्वर्ग, मृत्यु याविषयी कधी सांगितले नाही ते आपल्या किर्तनात लोकांच्या दैनंदिन जीवनावर बोलत असत त्यांच्या ढोंगीपणावर प्रहार करीत असत प्रबोधनाचे अंजन त्यांचे डोळ्यात घालत असत लोकांना समजेल अश्या भाषेत बोलत असत लोकांना प्रश्न विचारत असत आपल्या किर्तनात कळवळून ते लोकांना सांगत असत कर्ज काढून देवाची यात्रा करू नका गाई बैल यांची चिंता वाहत जा, मुलांना मुलींना शाळेत शिकविल्या विना राहू नका, देवाला नवस करून मुक्या प्राण्यांचा बळी देवू नका, आईबाबांची सेवा करा, हुंडा घेवून देवून लग्र करू नका, शिवाशिव पाळू नका, व्यसन करू नका गाडगेबाबांचे किर्तन म्हणजे समाज प्रबोधनाचे मंगलस्त्रोत होते. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे बाबांच्या किर्तनाचे धृपद असे.
स्वच्छता हा बाबांचा परिपाठ होता कीर्तनाच्या अगोदर सर्व गाव साफ करायचा स्वच्छता म्हणजे परमेश्वर, स्वच्छता म्हणजे प्रसन्नता, स्वच्छता म्हणजे आनंद स्वच्छता म्हणजे आरोग्य, स्वच्छता म्हणजे सहजीवनातील सुख, स्वच्छता म्हणजे ईश्वराची आराधना हे सांगत असत बाबांच्या हातातील झाडू म्हणजे स्वच्छतेचे साधन. एखादे साधन किती लहान अथवा किती मोठे याला महत्व नसते त्या साधनांचा मनुष्य कश्या प्रकारे उपयोग करतो हे महत्वाचे आहे. झाडूने मारताही येते व झाडताही येते. मारणे दुखदायक तर झाडने आनंददायक हे बाबांनी लोकांना पटवून दिले लोकांच्या पायाखालील रस्ते स्वच्छ करणारे बाबा माणसांची मने देखील सदाचाराने स्वच्छ करत असत सदाचार हा स्वच्छ माणसाचा खरा अलंकार होय.
संत गाडगेबाबा व्यवहारचतुर संत होते मानसे चुक करतात परंतु पुन्हा ती चूक सुधारता येते या गोष्टींवर बाबांचा विश्वास होता कोणी एकदा चूक केली की तो माणूस बिघडला असे नाही बिघडलेल्या माणसांना घडविण्याचे मोलाचे कार्य बाबांनी केले दगडातून सुंदर मूर्ती जशी घडवावी तशी अनेक दोष असलेल्या माणसांना सद्गुणी बनविण्याचे कार्य बाबांनी मोठ्या कौशल्याने केले
बाबांनी समाजातील निरक्षरता, अज्ञान, अनारोग्य ,अंधश्रध्दा अस्पृश्यता, असमानता, व्यसनाधिनता दूर करण्याचे मोठे कार्य केले आहे. अनेक धर्मशाळा, पाणपोई, शाळा, महाविद्यालये, गोरक्षण शाळा जनतेकडून बांधून घेतल्या परंतु त्याचा उपयोग स्वतःसाठी, स्वतःच्या कुटूंबासाठी किंवा समाजातील लोकांसाठी केला नाही किंवा उपभोग घेतला नाही बाबांनी मुंबई, पुणे, पंढरपूर, नासिक, देहू, आळंदी, नागपूर येथे धर्मशाळा बांधल्या रोग्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय व्हावी म्हणून मुंबईच्या जे. जे. हॉस्पीटल आवारात धर्मशाळा बांधली तिर्थक्षेत्रावर वारकऱ्यांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या अंध, अपंगाच्यासाठी नासिक येथे सदावर्त सुरु करुन त्यांना जेवणाची व्यवस्था केली. बाबा श्रीमंताच्या दातृत्वाला जागे करीत असत त्यांच्या सहकार्याने झुणका भाकरी सुरु केली खेडोपाडी किर्तनाच्या रुपाने सप्ताह सुरु केले. लाखो भुकेकंगाल लोकांना अन्नदान केले गरीबांना गोडधोड खाऊ घातले स्वत मात्र हातावर मावेल तेवढीच भाजी भाकरी खाली.
जळगांव जिल्ह्यातील फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन होते बाबांनी अधिवेशनाचे सारे पटांगण आरशासारखे स्वच्छ केले त्यावेळेस कोणीतरी म्हणाले होते बाबांनी आपली धर्मशाळा पंडीत नेहरूंना दाखवावी तेव्हा बाबा म्हणाले होते पंडीत नेहरु देशाचा कारभार चालवितात एवढ्या थोर नेत्याचा वेळ आपण घेवू नये आपण केलेल्या कार्याचा अहंकार मनात ठेवायचा नाही हीच बाबांच्या वागण्यातील रीत होती. बाबांचे जीवन कार्य पाहून परीट समाजाचे बांधव म्हणत असत की, “गाडगेबाबा म्हणजे आमच्या ज्ञाती समाजाचे पाणीदार मोती आहेत बाबांनी हे ऐकले व म्हणाले “नाही हो बाप्पा! मी एक फुटके गाडगे आहे मोत्याप्रमाणे पाण्याचा दवबिंदू होऊन एखाद्या तहानलेल्या चिमणीच्या तोंडात पडावे असे मला वाटते” या विचारातच बाबांचे मोठेपण साठविलेले आहे बाबांचे सहवासात अनेक थोर मंडळी आलीत त्यात मुंबईचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, आचार्य अत्रे, कर्मवीर भाऊराव पाटील, नानासाहेब तिडके, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार केशवराव ठाकरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्वांनीच बाबांच्या किर्तनाचा आस्वाद घेतला होता. धर्मांतर करतांना कोणता धर्म स्विकारावा हे सांगण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाबांना भेटले होते बाबा त्यांना म्हणाले होते डॉक्टरसाहेब सर्व पददलित समाज तुमच्या मागे आहे. त्यांची तुमच्यावर श्रध्दा आहे तुम्ही त्यांचे कल्याण कराल हा आत्मविश्वास तुमच्याविषयी मला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्विकारला बाबांनी त्यांचे स्वागत केले होते बाबांचे पहिले चरित्र लिहणारे प्रबोध कार केशवराव ठाकरे होय बाबांचे शेवटचे किर्तन ८-११-१९५६ रोजी वांद्रा रेल्वे पोलीस लाईनीत झाले.
गाडगेबाबा आपल्या किर्तनातून सतत सांगत असत की, मायबापहो देव तीर्थात नाही, मूर्तीत नाही, रानावनात नाही तो तुमच्या समोर दरिद्री नारायणाच्या रुपाने प्रत्यक्ष उभा आहे त्याची मनोभावे सेवा करा संत गाडगेबाबांनी दहा कलमी संदेश दिला आहे भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या,बेघरांना आसरा द्या, निराश झालेल्यांना हिंमत द्या, गरीब मुला मुलींना शिक्षण द्या,अंध पंगूना औषध द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या, गरीब मुले मुली यांचे लग्न लावून द्या, बेकारांना रोजगार द्या हीच देवाची भक्ती आहे, हीच देवाची पूजा आहे हेच बाबांचे तत्वज्ञान आहे. हेच बाबांचे पसायदान आहे या पसायदानाचा गाभा परमार्थ आहे ही दहा कलमी योजना गरीबांना जीवनदान देणारी आहे. एका निरक्षर माणसाने, एका बिनपगारी माणसाने, एका चिंध्या पांघरलेल्या माणसाने, एका हातात झाडू घेतलेल्या माणसाने, एका कानात बांगडी व एका कानात कवडी घातलेल्या माणसाने आपले जीवन कवडीमोल न मानता कोट्यावधी रुपयांच्या धर्मशाळा बांधल्या व एका उपभोगशून्य स्वामींचे जीवन सिध्द करून दाखविले अश्या निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना २३ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होत असलेल्या त्यांचे जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
लेख – नंदकुमार बगाडे पाटील (अहिल्या नगर)

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.