८ मार्चला मीरा-भाईंदर येथे नव्या दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते लोकार्पण
मीरा-भाईंदर (२६ फेब्रुवारी) – मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. येथील नव्याने उभारलेल्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा वकील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
न्यायालय स्थापन करण्यासाठी २००९ पासून प्रयत्न
शहराच्या लोकसंख्येत होत असलेल्या वाढीमुळे नागरिकांना प्रशासकीय व न्यायालयीन कामांसाठी वारंवार ठाणे गाठावे लागत होते. या समस्येची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २००९ पासून विविध प्रशासकीय आणि न्यायालयीन कार्यालये मीरा-भाईंदरमध्ये सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याच प्रयत्नांना यश येत नव्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीची निर्मिती झाली आहे.
या न्यायालयामुळे लाखो नागरिकांना ठाणे येथे जाण्याची गरज भासणार नाही, वेळ आणि आर्थिक खर्च वाचणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वकील संघटनेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
उद्घाटनाच्या तयारीचा आढावा
मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच नव्या इमारतीची पाहणी केली. इमारतीचे अंतर्गत सजावट व शेवटची कामे २ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ८ मार्च रोजी होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याने मीरा-भाईंदर शहराच्या न्यायव्यवस्थेत नवा अध्याय सुरू होणार आहे.















