लालबागकरांवर धुळीचं महासंकट! प्रशासनाचा निष्क्रियपणा उघड
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील लालबाग परिसरातील रहिवासी सध्या गंभीर त्रास सहन करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील विकासकामांमुळे डंपरच्या सततच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे. डंपरचे टायर रस्त्यावर माती पसरवत असल्याने ती वाळूमध्ये रूपांतरित होते आणि संपूर्ण परिसर धुळीच्या विळख्यात सापडला आहे.
रहिवाशांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाला तक्रारी दिल्या, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या धुळीमुळे नागरिकांना डोळ्यांचे आणि श्वसनाचे विकार होत आहेत. हवेत सतत उडणाऱ्या धुळीमुळे रहिवाशांचा दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
महेंद्र मंदाकिनी जगन्नाथ तावडे (अखिल भारतीय मराठा महासंघ, मुंबई शहर सरचिटणीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशासन उपाध्यक्ष) यांनी प्रशासनाला आवाज उठवण्याची मागणी केली आहे. रहिवाशांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
जर प्रशासनाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत, तर रहिवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्वरित रस्त्यांची नियमित साफसफाई, पाणी मारून धूळ कमी करणे आणि डंपरच्या टायरमधील माती नियंत्रित करणे यांसारख्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत.
प्रशासनाने नागरिकांचा त्रास गांभीर्याने घ्यावा आणि लवकरात लवकर कारवाई करावी, हीच लालबागकरांची मागणी आहे!

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.