ब्रेकींग बातमी
धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्विकारला
मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मंत्री धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राजकीय दबावामुळे राजीनामा?
संतोष देशमुख यांच्या हत्येचे अत्याचारपूर्ण फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सभागृहात गोंधळ घालण्याची भूमिका घेतली होती. अखेर या दबावामुळे धनंजय मुंडे यांना आपले मंत्रिपद सोडावे लागले.
मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय?
धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे कारण म्हणून प्रकृती अस्वास्थ्याचा उल्लेख केला आहे. मात्र, विरोधकांनी आता त्यांची आमदारकीही रद्द करण्याची मागणी केली आहे.
मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत या प्रकरणातील तपास आणि त्यावर होणाऱ्या राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष असेल.

Author: Prachi Sutar
Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.