राजापूर तालुक्यातील आंगले गाव विकासापासून वंचित – प्रशासनाचे दुर्लक्ष?
रत्नागिरी प्रतिनिधी: निलेश रहाटे
राजापूर तालुक्यातील आंगले गावातील विकासकामांना गेल्या कित्येक वर्षांपासून निधी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी वारंवार निवेदने देऊन, स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटून, तसेच जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
ग्रामस्थांच्या मते, शासनाकडून योग्य निधी न मिळाल्याने गावातील मूलभूत सुविधा अपुऱ्या राहिल्या आहेत. स्थानिक लोकांनी यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार केला असला तरी, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
गावातील प्रलंबित विकासकामे:
१) मुख्य रस्ता दुरुस्तीची गरज
२) रामेश्वर मंदिरासमोरील मोरी रुंदीकरण – पावसाळ्यात पाणी अडून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
३) वरची राऊतवाडी येथे ओढ्यालगत संरक्षक भिंत – घरांना धोका टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक.
४) नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविणे
५) नवीन थ्री-फेज वीजवाहिनी टाकणे
६) जुना ट्रान्सफॉर्मर नवीन ठिकाणी स्थलांतर करणे
७) राजापूर आगार ते राजापूर रेल्वे स्टेशन या मार्गावर (शीळ-गोठणे-आंगले) बस रस्त्याची दयनीय अवस्था
८) नादुरुस्त विद्युत खांब दुरुस्त करणे
९) मोबाईल टॉवर अभावी संपूर्ण गाव मोबाईल नेटवर्कशिवाय
गावातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षण व डिजिटल सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक आहे. मात्र, मोबाईल टॉवर नसल्याने गाव डिजिटल सेवांपासून वंचित आहे. अशा परिस्थितीत “डिजिटल इंडिया” आणि “स्मार्ट ग्रामपंचायत” सारखी संकल्पना किती उपयोगी, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाने त्वरित लक्ष घालून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकार आणि प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा ग्रामस्थ अधिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात जातील.

Author: Nilesh Rahate
🔴 निलेश रहाटे 🔴 मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी