साटवली ग्रामपंचायतीचे अपंगांवर अन्याय? लाखो रुपयांची अपंग व्यावसायिक गाळ्यांची इमारत झाडीझुडपांत धुळखात; ग्रामपंचायत व सदस्यांवर सामाजिक कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

साटवली ग्रामपंचायतीचे अपंगांवर अन्याय?

लाखो रुपयांची अपंग व्यावसायिक गाळ्यांची इमारत झाडीझुडपांत धुळखात; ग्रामपंचायत व सदस्यांवर सामाजिक कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप


लांजा तालुक्यातील साटवली बाजारपेठेत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अपंग कल्याण निधीतून २०१७-१८ मध्ये सुमारे २.३५ लाख खर्चून अपंग व्यावसायिक गाळ्यांची स्लॅब इमारत बांधली; मात्र २०१८ पासून आजतागायत एकाही अपंग व्यक्तीस दिली नाही. इमारत झाडीझुडपांनी वेढलेली, धुळखात पडलेली असून ग्रामपंचायत व वॉर्ड सदस्यांकडून मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप.

लांजा प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण):

लांजा तालुक्यातील साटवली बाजारपेठेत अपंग बांधवांसाठी उभारण्यात आलेली लाखो रुपयांची इमारत आज झाडीझुडपांत वेढलेली, धुळधाण झालेली, वापराविना पडून आहे. ग्रामपंचायतीने या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा साटवली गावातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश पावसकर यांचा गंभीर आरोप आहे.

जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या अपंग कल्याण निधी (७५ टक्के भांडवली) सन २०१७-१८ अंतर्गत

“ग्रामपंचायत साटवली, ता. लांजा येथे अपंग व्यापारी गाळे बांधणे” या नावाने हे काम मंजूर झाले.

या कामासाठी अंदाजे २,३५,००० रुपये खर्च दाखविण्यात आला असून कार्यान्वित यंत्रणा – माननीय कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद रत्नागिरी अशी नोंद आहे.

सदर अपंग व्यापारी गाळ्यांची स्लॅब इमारत २०१८ साली पूर्ण झाली. मात्र,

या इमारतीत एकाही अपंग व्यक्तीस व्यावसायिक गाळा देण्यात आला नाही,

इमारतीची साफसफाई, देखभाल, ताळेबंद काहीच नाही,

संपूर्ण इमारत आज झाडीझुडपांनी वेढलेली, दूरूनही इमारत दिसेनाशी झालेली आहे.

गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत वारंवार हा विषय उपस्थित करूनही,

साटवली ग्रामपंचायत,ग्रामपंचायत सरपंच,तसेच संबंधित वॉर्ड मधील ग्रामपंचायत सदस्य

यांनी या गंभीर विषयाकडे कानाडोळाच केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते अविनाश पावसकर म्हणाले,

> “अपंगांसाठी खास करून ही स्लॅब इमारत बांधण्यात आली. शासनाचा निधी खर्च झाला, पण प्रत्यक्षात एकाही अपंग बांधवाला या गाळ्यांचा लाभ दिला गेला नाही. इमारत उभी केली आणि निधी खर्च झाला, एवढंच! उपयोग शून्य. हा सरळसरळ शासन निधीचा अपव्यय आणि अपंग बांधवांवर अन्याय आहे.”

त्यांनी पुढे आरोप केला की,

सदर इमारतीची स्वच्छता, साफसफाई, तटबंदी, सुरक्षितता याबाबत ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नाही,

ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत आश्वासन देऊन विसरते,

वॉर्ड सदस्यांकडे तक्रार करूनही ते मुद्दाम कानाडोळा करत आहेत.

पावसकर यांचे म्हणणे आहे की,

> “अपंग व्यावसायिक गाळ्यांचे हे काम पूर्ण होऊन तब्बल काही वर्षे उलटली, पण आजपर्यंत ते प्रत्यक्ष वापरात आले नाही. शासनाकडून मिळालेला अपंग कल्याण निधी कागदावरच दाखवण्यासाठी वापरला गेला, प्रत्यक्ष अपंगांसाठी नव्हे, अशी स्थिती आहे.”

ग्रामस्थांत त्यामुळे रोष पसरला असून,सदर इमारत तातडीने स्वच्छ करून,व्यवस्थित नोंदणी करून,पात्र अपंगांना गाळे वाटप करावेत,अनियमिततेचा मागोवा घेऊन चौकशी करावी

अशी जोरदार मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे.

 

२०१८ पासून आजपर्यंत धुळखात पडलेल्या या इमारतीकडे आता तरी जिल्हा परिषद, अपंग कल्याण विभाग व तहसील प्रशासन लक्ष देणार की नाही, याकडे साटवली ग्रामस्थांसह लांजा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]