राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयाचे घवघवीत यश; साहिल आग्रे प्रथम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयाचे घवघवीत यश; साहिल आग्रे प्रथम

तळवली (मंगेश जाधव) –

हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध व वक्तृत्व स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी साहिल दिलीप आग्रे याने ‘भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व’ या विषयावर सादर केलेला निबंध सर्वोत्कृष्ट ठरवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 

हुंडाविरोधी चळवळ ही संस्था गेल्या ५३ वर्षांपासून हुंडा प्रथेविरोधात विविध जनजागृती उपक्रम राबवत आहे. २६ नोव्हेंबर १९९२ पासून दरवर्षी ‘हुंडाविरोधी दिवस’ साजरा करण्यात येतो. त्यानंतर १० डिसेंबर ‘मानवाधिकार दिना’पर्यंत युवकांसाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सन २००५ पासून महाराष्ट्र शासनानेही या उपक्रमास शासकीय पाठिंबा दिला आहे. यंदा या उपक्रमाचे ३७ वे वर्ष असून भारतीय संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त स्पर्धांचे विषय संविधान, समानता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित ठेवण्यात आले होते.

 

या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील ८६ महाविद्यालयांमधून एकूण २५६ निबंध प्राप्त झाले. स्पर्धेतील विषय पुढीलप्रमाणे होते –

१) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व

२) हुंडा रूढीच्या निर्मूलनासाठी विद्यमान कायद्यांची निष्प्रभता

३) भारतीय संविधानातील समानतेचे मूलतत्त्व हुंड्याची रूढी कशाप्रकारे विफल करते?

 

पाटपन्हाळे महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची कु. नेत्रा प्रसाद पाध्ये हिनेही गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून महाविद्यालयाला श्री रोशनलाल तलवार ट्रॉफी जाहीर झाली आहे. विषय क्रमांक २ व ३ साठी अनुक्रमे सायन (मुंबई) येथील के. जे. सोमय्या नर्सिंग महाविद्यालयाची अर्पिता खोंड आणि कोडोली (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील वासंतीदेवी पाटील फार्मसी महाविद्यालयाची कन्याकुमारी चिपकर यांना प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.

 

साहिल आग्रे व नेत्रा पाध्ये या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच साहिल आग्रे याने नुकत्याच एस. बी. कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर (जि. ठाणे) येथे आयोजित कै. सोनुभाऊ बसवंत स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून ट्रॉफी, प्रमाणपत्र व रु. १५००/- रोख बक्षीसही प्राप्त केले आहे.

 

या यशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक, पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता साठ्ये महाविद्यालय सभागृह, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार असून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे माजी अध्यक्ष श्री. संजय मंगला गोपाळ यांच्या शुभहस्ते पार पडणार असल्याची माहिती हुंडाविरोधी चळवळीच्या वतीने देण्यात आली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]