विद्यार्थ्यांनी वाचनातून स्वतःला समृद्ध करावे : प्रकाश पवार

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांनी वाचनातून स्वतःला समृद्ध करावे : प्रकाश पवार

वाटद कवठेवाडी शाळेत सलग १२ तास वाचन उपक्रम उत्साहात

रत्नागिरी खंडाळा (प्रतिनिधी) :निलेश रहाटे

आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून त्यांनी वाचनाच्या माध्यमातून स्वतःला समृद्ध करावे, असे मत बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

ते जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शालेय व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित सलग १२ तास वाचन उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिशादर्शक आहे. त्यांच्या विचारांचे आकलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चरित्र, साहित्य आणि विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची सवय लावणे आवश्यक आहे. शाळेने राबविलेला सलग १२ तास वाचन उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

समारोप प्रसंगी उपस्थित राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक डॉ. राजेश जाधव यांनीही उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा संघर्ष जगात क्वचितच आढळतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी ज्ञानाच्या जोरावर आधुनिक भारताचा पाया रचला. त्यामुळेच त्यांना “सिम्बॉल ऑफ नॉलेज” म्हटले जाते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सातत्याने वाचन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील सुमारे ३०० हून अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आवडीची पुस्तके वाचून त्यावर टिपणेही केली. समारोपावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या वाचन अनुभवांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, सदस्य उदय दामाजी रहाटे, बालरक्षक विश्वनाथ शिर्के, प्रिया तांबटकर, मनस्वी तांबटकर, अक्षरा शिर्के यांनी सहभाग घेतला.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ यांच्या सूचनेनुसार मुख्याध्यापक माधव अंकलगे व सहशिक्षिका राधा नारायणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी सत्कोंडी-पन्हळी-कांबळेलावगण ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश थुळ, सामाजिक कार्यकर्ते रजत पवार, अरुण मोर्ये, विलास बारगुडे अशोक सांबरे, शिरीष लिंगायत, मारुती कुर्टे, तसेच पालक, ग्रामस्थ व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लहानशा शाळेतून राबविण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]