पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

 

राजापूर – संदीप शेमणकर

राजापूर तालुक्यातील 

जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रिक्त वैद्यकीय अधिकारी पद तातडीने भरण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सुमारे २० ते २५ किलोमीटर परिसरातील अनेक गावे आणि उपकेंद्रांचा समावेश असलेल्या जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वी दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. त्यापैकी बॉण्डवर कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली झाली. मात्र, त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने संपूर्ण आरोग्य सेवेची जबाबदारी एकाच डॉक्टरांवर आली आहे.

सध्या कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी नियमित बाह्यरुग्ण सेवा, प्रशासकीय कामकाज, लसीकरण मोहिमा, विविध उपकेंद्रांच्या भेटी तसेच आपत्कालीन रुग्णसेवा अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सेवा सुरू असली तरी वाढत्या कामाच्या ताणाचा परिणाम भविष्यात आरोग्य सेवेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लवकरच पावसाळा सुरू होत असून या काळात ताप, सर्दी, डेंग्यू, मलेरिया तसेच इतर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात किमान दोन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी उपलब्ध असणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या आरोग्य केंद्राअंतर्गत डोंगर, साखर, पडवे, अनसुरे, जाणसी आदी उपकेंद्रांचा समावेश आहे. याशिवाय काही उपकेंद्रांमधील कर्मचारी पदेही रिक्त असल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिकच अडचणीत सापडली आहे.

दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली टुकरुल यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. रिक्त पदावर तातडीने नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आली असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ही बाब आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली असून प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून जैतापूर परिसरातील नागरिकांना सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

एकमेव वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर मोठा कामाचा ताण पडत असून आरोग्य सेवेची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी दुसरे रिक्त पद तातडीने भरणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें