सागरी महामार्गावरील खड्ड्यांवर ‘रत्नागिरी डिजिटल वार्ताहर’चा प्रभाव; प्रशासनाकडून युद्धापातळीवर दुरुस्ती सुरू
सरपंच मनोज चंदूरकर यांच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अॅक्शन मोडमध्ये; कोंडये हद्दीतील कामाची तातडीने सुरुवात
लांजा (प्रतिनिधी: जितेंद्र चव्हाण):
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर आणि शासकीय निधीच्या अपव्ययावर ‘रत्नागिरी डिजिटल वार्ताहर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. लांजा शहराकडून कोंडयेमार्गे साटवलीकडे जाणाऱ्या सागरी महामार्गाची (राज्य महामार्ग क्र. १६८) अवघ्या २-४ महिन्यांत झालेल्या दुर्दशेबाबत वृत्त प्रसिद्ध होताच आणि कोंडयेचे सरपंच मनोज चंदूरकर यांनी गणेशोत्सवापूर्वी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेताच प्रशासनाला जाग आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कालपासूनच कोंडये हद्दीत मजूर आणि साहित्य उतरवून खड्डे बुजवण्याचे काम युद्धापातळीवर सुरू केले आहे.
३५ लाखांचा निधी खड्ड्यात घालणाऱ्या या महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातांची शक्यता वाढली होती आणि स्थानिक ग्रामस्थांसह चाकरमान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत बातमीचा दणका बसताच प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या.
काम सुरू झाल्याने वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, “थातुरमातूर किंवा निकृष्ट दर्जाचे काम चालणार नाही. केवळ माती टाकून डोळ्यात धूळफेक केल्यास पुन्हा गाठ कोंडये ग्रामस्थ व चाकरमान्यांशी असेल,” असा रोखठोक इशारा सरपंच मनोज चंदूरकर यांनी दिला आहे.









