राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून, काही भागांत उन्हाचा तडाखा तीव्र होत असताना काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आगामी पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पावसाचे सावट कायम
चंद्रपूर, लातूर, संभाजीनगर, सांगली आणि इतर काही भागांमध्ये अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे वातावरण अधिकच अनिश्चित बनले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
तापमानात वाढ, पावसासाठी पोषक वातावरण
राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे. परिणामी, दक्षिणेकडील भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. वाढत्या तापमानामुळे ढगांची निर्मिती वेगाने होत असून, राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पाहायला मिळू शकतो.
नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा
अवकाळी पावसाच्या या इशाऱ्यानंतर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच, जोरदार वाऱ्यामुळे घराबाहेर असलेल्या वस्तूंची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सतर्क राहा, सुरक्षित राहा!
पुढील काही दिवस हवामानातील या बदलांचा नागरिकांनी सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. प्रशासनाकडूनही सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.