गुहागर शहरातील प्रमुख रस्ता निकृष्ट; त्वरित दुरुस्तीसाठी पराग कांबळे यांचा इशारा
आबलोली (संदेश कदम): गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर असलेल्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जर लवकरच याबाबत योग्य पावले उचलली नाहीत, तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा गंभीर इशारा बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी दिला आहे.
गुहागर हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध पर्यटन स्थळ असूनही, शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. गुहागर शहरापासून शासकीय विश्रामगृहाजवळील तिसऱ्या वाकणपर्यंतचा रस्ता मोठमोठे खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे अपघातग्रस्त झाला आहे. या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
पराग कांबळे यांनी यासंदर्भात ठेकेदार आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. “लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी आहेत की नाहीत, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. गुहागर-विजापूर मार्गावरील प्रश्न आम्हाला माहित नाहीत, परंतु या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानीय नागरिक आणि प्रवासी संघटनांनीही या समस्येवर आवाज उठवला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनाच्या तयारीला राहावे, असे मत व्यक्त केले जात आहे. प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.