पश्चिम आफ्रिकेत ‘एमव्ही बिटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण – दोन रत्नागिरीकरांसह सात भारतीय बेपत्ता
रत्नागिरी, ३० मार्च २०२५: पश्चिम आफ्रिकेच्या साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ १७ मार्च रोजी समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बिटू रिव्हर’ या बिटुमेन वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला करून १० खलाश्यांचे अपहरण केले. अपहरितांमध्ये सात भारतीय आणि तीन रोमानियन नागरिकांचा समावेश असून, त्यात रत्नागिरीतील समीन जावेद मिरकर आणि रेहान शब्बीर सोलकर हे दोन तरुण देखील आहेत.
पनामा ध्वजांकित हे जहाज रुबिस अॅस्फाल्ट कंपनीद्वारे चालवले जात होते. ते रिफायनरीमधून बिटुमेन मिळवून पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत त्याचे वितरण करते. हल्ल्यानंतर जहाजावरील १८ खलाश्यांपैकी १० जणांना समुद्री चाच्यांनी त्यांच्या ताब्यात घेतले. अपहरणानंतर ११ दिवस उलटूनही या खलाश्यांबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. तसेच समुद्री चाच्यांकडून कोणत्याही खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही.
अपहरितांच्या सुटकेसाठी त्यांचे कुटुंबीय प्रयत्नशील असून, त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालय, डीजी शिपिंग आणि महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून खलाश्यांची सुखरूप सुटका करण्याची मागणी केली आहे.
भारतीय अधिकारी आणि संबंधित संस्था या घटनेची दखल घेत असून, अपहरित खलाश्यांच्या सुरक्षित मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
– प्रतिनिधी, रत्नागिरी















