राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ पुस्तकाचे १३ रोजी प्रकाशन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ पुस्तकाचे १३ रोजी प्रकाशन

banner

तळवली (मंगेश जाधव)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष, साहित्यिक, कवी राष्ट्रपाल सावंत यांचे आत्मकथन असलेल्या ‘गतस्मृतीची गजबज’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता प्रांत ऑफिसच्या मागील बाजूस असलेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात होणार आहे. डॉ. आंबेडकर वाचनालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त सुरु असलेल्या विविध उपक्रमांतर्गत कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा संपन्न होईल. यानिमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वदिनी, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने जाणाऱ्या शिक्षकाचे आत्मकथन प्रकाशित होत आहे.

ज्येष्ठ साहित्यिक, कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात आमदार शेखर निकम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि नामवंत वक्ते प्रा. मिलिंद जोशी, संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिताराजे पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक, केशवसुत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, चिपळूण तालुका बौद्धजन हितवर्धन समितीचे अध्यक्ष विठोबादादा पवार, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष संतोष कदम, अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनिल हेतकर, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे राज्याध्यक्ष अनिलकुमार जोशी, लेखक-स्तंभलेखक प्रकाश जाधव, लेखिका नीला नातू आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. पुस्तकाचा परिचय श्रीमती आसावरी जोशी-देशपांडे, कवी-लेखक संदेश पवार करून देणार आहेत. महाराष्ट्र शासनाचा ‘निर्मलग्राम पुरस्कार समारंभ’ २००८, राज्यस्तरीय कीर्तनकार मेळावा आळंदी, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ काव्यलेखन व कथालेखन शिबिर, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणे – नवलेखक कार्यशाळेसाठी निवड झालेले सावंत हे २४ वे अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन, १० वे जलसाहित्य संमेलन, ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रित कवी आहेत.

वेदनेचे तत्त्वज्ञान मांडणारे, दलित हुंकाराचे भाष्यकार लेखक, समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची बहुमोल प्रस्तावना लेखन आणि लेखकाचे अनेक अदृश्य पैलू वाचकांसमोर ठेवणारी म्हणून महत्त्वाची आहे. तर राष्ट्रपाल सावंत यांच्या साहित्यिक जडणघडणीचे साक्षीदार असलेले प्रसिद्ध कवी, भाषा अभ्यासक, समीक्षक अरुण इंगवले यांचा लेखनाची पाठराखण करणारा ब्लर्ब पुस्तकाचे संदर्भमूल्य समजावून सांगतो आहे. या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कोपसाप चिपळूण शाखेच्या कार्याध्यक्षा प्रा. अंजली बर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनिल खेडेकर यांनी केले आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...