अशोका बिल्डकॉन कंपनी ने केली पायवाट अडवणूक, आंबा वाहतुकीस अडथळा, तहसीदार यांचे कडे तक्रार
तवसाळ खुर्द गावातील महामार्गाच्या कामामुळे शेतमाल वाहतूक ठप्प, कंपनीकडून स्थानिकांवर दबावाचा आरोप
गुहागर तालुका | तवसाळ खुर्द गावामध्ये सुरु असलेल्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामात अशोका बिल्डकॉन कंपनीकडून स्थानिक शेतकऱ्यांची पायवाट अडवून ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप पडवे येथील अभय मुरलीधर गडदे यांनी केला आहे. त्यांनी तहसीलदार, गुहागर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार सादर केली आहे.
गडदे यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या सर्वे नंबर 602 मधील 13 आणि 14 मध्ये आंबा बाग आहे. या बागेस लागून सरकारी नोंद 26 क्रमांक असलेल्या जुन्या पायवाटेने शेतातील मालवाहतूक व वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी ये-जा सुरु असते. मात्र, अशोका बिल्डकॉन कंपनीने महामार्गाच्या पूल बांधकामासाठी या पायवाटेवर उत्खनन करून ती पूर्णपणे बंद केली आहे. एवढेच नव्हे, तर कंपनीचे अधिकारी गडदे कुटुंबियांना आणि त्यांच्या मजुरांना स्वतःच्या जमिनीवरून देखील ये-जा करण्यास मज्जाव करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
गडदे यांनी यावेळी यावर्षीच्या आंबा हंगामात होत असलेल्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, त्यामुळे उपजीविकेवरच संकट ओढवल्याचे सांगितले. एवढ्यावरच न थांबता, संबंधित अधिकाऱ्यांकडून उघड्यावर ठेवलेल्या शेतमालाबाबत चोरीचे खोटे आरोप लावले जाण्याचीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची योग्य चौकशी करून कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच वादग्रस्त पायवाट पूर्ववत करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
—
#गुहागर #तवसाळखुर्द #रेवसरेड्डीमहामार्ग #अशोका_बिल्डकॉन #आंबा_शेती #शेतकऱ्यांचा_प्रश्न #RatnagiriNews #KonkanDevelopment
फोटो
—















