महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं मिटवायला तयार; पण एक अट!
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या सादेला दिला सकारात्मक प्रतिसाद, पण ‘ही’ एक अट स्पष्ट ठेवली
मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं वेगाने बदलत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी दिलेली साद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही या सादेला होकार दिला आहे, मात्र एक अट ठेवत त्यांनी राज ठाकरेंसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कामगार सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्याकडून कुणाशी भांडण नव्हतंच, मी मिटवून टाकली. पण एक गोष्ट ठरवायला हवी – महाराष्ट्राच्या हिताचं सरकार कोण घडवू शकतं? जेव्हा गुजरातला प्रकल्प जात होते, केंद्र सरकार महाराष्ट्राविरोधात निर्णय घेत होतं, तेव्हा जर विरोध केला असता तर आज चित्र वेगळं असतं.”
ते पुढे म्हणाले, “माझी अट एकच – महाराष्ट्राचं हित. जे कोणी या हिताच्या आड येतील, त्यांचं मी स्वागत करणार नाही, त्यांच्या घरी जाणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवता येतील, पण हा प्रश्न नाही.”
उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा देत म्हटलं, “पाठिंबा द्यायचा तर बिनशर्त द्या. विरोध करायचा तर ठाम करा. एकदा सोबत आलात तर पुन्हा कुणाच्या भेटीगाठी नाहीत, प्रचार नाही. ही पहिली शपथ असली पाहिजे – शिवाजी महाराजांची.”
या वक्तव्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, यावर चर्चांना नवसंजीवनी मिळाली आहे. दोन्ही नेत्यांच्या भूमिकांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. युती झाली, तर विरोधकांपुढेही नवं आव्हान उभं राहू शकतं.
#उद्धवठाकरे #राजठाकरे #महाराष्ट्रहित #मनसे #शिवसेना #राजकीययुती #मराठीमन #MaharashtraPolitics #ThackerayBrothers















