देवरुखमध्ये नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच वाटप; तक्रार आल्यास थेट पोलिस कारवाईचा इशारा – ना. उदय सामंत
सात महिन्यांत ५० हजार बांधकाम कामगारांची नोंदणी; रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला, मोफत कर्करोग प्रतिबंधक लसीकरण उपक्रम लवकरच सुरू
संगमेश्वर – तालुक्यातील देवरुख येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वाटपप्रसंगी ना. सामंत यांनी बांधकाम कामगारांसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देताना स्पष्ट सांगितले की, “साहित्य वाटपात जर कुणी गैरप्रकार करत असेल आणि तशी तक्रार प्राप्त झाली, तर चौकशी करून संबंधितांवर थेट पोलिस कारवाई केली जाईल.”
या कार्यक्रमात त्यांनी अभिमानाने नमूद केले की, “रत्नागिरी हा संपूर्ण महाराष्ट्रातला पहिला जिल्हा ठरला आहे जिथे केवळ सात महिन्यांत १० हजार नोंदणीवरून ५० हजारांहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.”
यावेळी ना. सामंत यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, “रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १ लाख महिला-भगिनींना कर्करोग होऊ नये म्हणून पुढील महिन्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोफत इंजेक्शन देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.”
याशिवाय, अंमली पदार्थांच्या विळख्यात नवीन पिढी अडकू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, माजी सभापती बाबू म्हाप, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, उपतालुका प्रमुख सचिन मांगले, शहरप्रमुख सनी प्रसादे, प्रसाद सावंत, कामगार उपायुक्त संदेश आयरे, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, नगरसेवक वैभव पवार, देवरुख नगरपंचायत मुख्याधिकारी श्री. विसपुते, तहसीलदार अमृता साबळे तसेच मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.
—
#उदयसामंत #बांधकामकामगार #रत्नागिरी #देवरुख #साहित्यवाटप #मोफतलसिकरण #शिवसेना #रत्नागिरीघडामोडी #सुरक्षासंच #कामगारकल्याण















