गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

विरार – संदीप शेमणकर

गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापन दिन दिनांक 15 जून 2025 रोजी विरार (पूर्व) येथे अत्यंत उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा झाला. या कार्यक्रमाला 700 हून अधिक समाज बांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून सहभाग नोंदवला. विविध उपक्रमांमधून समाज एकत्र येत समाजबांधवांमध्ये एकात्मतेचे दृश्य दिसून आले.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. व श्री. संतोष तटकरे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजेने झाली. यानंतर लहान मुलांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर झालेल्या नृत्य व गायन स्पर्धांमुळे वातावरणात उत्साह संचारला.

यावेळी विशेषतः 10वी, 12वी व पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महिलांसाठी पारंपरिक हळदीकुंकू कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधताना काही सामाजिक सुधारणा मांडल्या. त्यांनी सांगितले की, विधवा माताभगिनींच्या सौभाग्य अलंकारांचा त्याग समाजात आता होणार नाही आणि कोणत्याही समारंभात होणारा अनावश्यक खर्च रोखण्यात येईल. समाजाने या ठरावाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

मा. स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत समाजमंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य पाठपुरावा व मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी 10वीमध्ये 95% गुण प्राप्त केलेल्या कु. संस्कृती खरपुडे हिला 11,000 रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले.

संघटनेचे संस्थापक विपुल पोरे यांनी “समाज संघटन अधिक बळकट करण्यासाठी ट्रस्ट व संघटना एकत्र येऊन काम करतील,” असे सांगून समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले.

संघटनेचे अध्यक्ष दिनू रिकामे यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मागील 3 वर्षांचा कार्यअहवाल सादर करत आगामी काळात समाजकल्याणाचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेविका सौ.अश्विनी ठसाळे, मा. नगरसेविका सौ. मीनल पाटील, भाजप चे विरार मा. अध्यक्ष नारायण मांजरेकर , प्रहार जनशक्ती पक्ष पालघर अध्यक्ष हितेश जाधव,समाजसेवक गणेश वाजे, विठोबा महाडिक,शांताराम गायकर, दत्ताराम बोबडे, भरत रिकामे ,सुधीरदादा वरणकर ,अर्जुन गायकर, देवेंद्र तटकरे, नरेश तटकरे , मंगेश तटकरे पत्रकार दिपक मांडवकर त्यांचे सहकारी शिंदे, पत्रकार संदिप शेमणकर ,मनोज साखरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रायगड जिल्हाप्रमुख अविनाश काते यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव सुशांत घोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास धुमाळ, विशाल रिकामे, विनोद रिकामे,अभिनंदन नटे ,व इतर सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन एकजुटीने आयोजन यशस्वी केले.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...