मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत आयोजित श्रावण पौर्णिमा वर्षावास धम्म संस्कार समारंभ संपन्न..!
आबलोली (संदेश कदम) ….
रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या श्रावण पौर्णिमा वर्षावास धम्म संस्कार समारंभ नुकताच ‘ जिद्द ‘ सहकारी गृहनिर्माण संस्था ,पागझरी रोड, चिपळूण येथे संपन्न झाला. गेली 28 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण आणि एड्स आदी क्षेत्रात कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या श्रावण पौर्णिमा वर्षावास धम्म संस्कार समारंभ संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या अधिपत्याखाली तर बुद्धपुजा पाठ संस्कार आयु. सुनील शिवगण गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विचारपीठावर मुख्य व्याख्याते, धम्म मार्गदर्शक ,धम्म उपासिका आदरणीय विशाखाताई गमरे (प्राथमिक शिक्षिका, बामणोली ,चिपळूण) यांच्या समवेत जनजागृती सेवाभावी संस्था, चिपळूण संस्थाध्यक्ष डॉ.संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते सन्मा. काशिराम कदम गुरुजी उपस्थित होते .या श्रावण पौर्णिमा वर्षावासाचे औचित्य साधून धम्म उपसिका, आदरणीय विशाखाताई गमरे यांनी ‘ बौद्ध धम्मातील आदर्श महिलांचे कार्य, कर्तृत्व आणि फुले ,शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील महिलांची सद्यःस्थिती’ या विषयांतर्गत उपस्थित उपासक, उपासिकाना संबोधित करताना सद्यःस्थितीत भारतालाच काय? अखिल विश्वाला बौद्ध धम्माशिवाय तरणोपाय नाही. बुद्धकालीन मातृसत्ताक असलेल्या या भारतवर्षात प्रत्येक स्त्री सुरक्षित होती.तिला सन्मानाने , आदराने जगण्याचा अधिकार होता . परंतु आजच्या घडीला दोन-चार वर्षाच्या बालिकापासून ते साठ वर्षाच्या वयोवृद्ध स्त्रीवर होणारे लैंगिक अत्याचार हे कशाचे द्योतक आहे? यावर चीड व्यक्त करून त्यांनी बुद्धकालीन भिक्षुणी सुजाता, भिक्षुणी पट्टाचारा , भिक्षुणी आम्रपाली, अशा अनेक भिक्षुणींच्या कार्य, कर्तृत्वाची, विशेषत: आदर्शाची उदाहरणे देऊन उपस्थितांना बुद्धकालीन ते आजच्या सद्यःस्थितीतचे विचार मंथन करण्यास भाग पाडले.
त सेच बौद्ध धम्मातील प्रत्येक उपासकाने अंगीकारलेले धम्माचे आचरण हाच खरा त्यांच्या जीवन मुल्याचा निकष आहे. यावर विस्तृत विचार व्यक्त करताना डॉ. संजय सावंत यांनी धम्म आणि आरोग्य, धम्म आणि संविधान व संविधान आणि रोजगार याविषयी त्यांनी वेगवेगळ्या अंगांनी सहज सुलभरित्या यावर भाष्य केले. तर सन्मा. काशीराम कदम गुरुजींनी मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्या वतीने जे जे उपक्रम राबवले जात आहे हेच खरे सत्कर्माचे प्रतिक म्हणावे लागेल. बुद्ध धम्मातील ‘सत्कर्म’ या विषयी भगवान बुद्धानी केलेले भाष्य जे चांगले काम केले जाते ते सत्कर्म. जे दान पारमितामध्ये कोणत्याही दानाच्या माध्यमातून केलेले दानाचे कार्य ते सत्कर्म आणि आजच्या वर्षावासाच्या अनुषंगाने धम्मातील उपासक, उपासिकांना धम्मविचारपीठ उपलब्ध करून धम्मातील मानवी जीवन मुल्यांवर सुसंवाद साधण्याकरिता आयोजित केलेला हा धम्मसंस्कार म्हणजे या मौलिक सत्कर्माचा एक मी भाग म्हणेन असे प्रतिपादन केले. तसेच मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी संस्कार समारंभाची सांगता करताना म्हणाले , धम्माला ऊर्जितावस्था प्राप्त करण्याकरिता सद्यःस्थितीत प्रत्येक पालकांसमवेत घरातील बालकांच्याही तनामनामध्ये बुद्ध, धम्म, संघाची संज्ञा आणि प्रज्ञा, शील , करुणेची ‘ धम्मपदा’ रुजवली गेली पाहिजे. देशातल्या प्रत्येक प्रज्ञावंत नागरिकांनी जर बुद्धांचे ‘ पंचशील ‘ अंगीकारले तर अन्याय, अत्याचार, बलात्कार, हिंसाचार, हत्याकांडाच्या भीषण उद्रेकाच्या विषारीवृत्तीला निश्चितच आळा बसेल. असा ठाम विश्वास व्यक्त करून समाजातील प्रत्येक समाजघटकांनी संविधान साक्षर होणे आज काळाची गरज आहे असे म्हणाले. या अनुषंगाने कायद्याचा अभ्यास करणारी धम्मउपासिका कु. सेजल संजय सावंत हिचा प्रोत्साहनपरत्वे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी निवृत्ती आरोग्य अधिकारी अनंत हळदे , विद्युत महामंडळाचे निवृत्त अधिकारी अशोक जाधव, संजय पवार, मिलिंद सावंत , चिपळूण एसटीतील आगारातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहिते, सुदाम सावंत, अजित कुरणे आदी समवेत महिला उपासिका बहुसंख्य उपस्थित होत्या.सौ. राजक्रांती कदम-तांबे (मिरजोळी, चिपळूण) यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विस्तृतपणे धम्मातील, समाजातील आणि विविध कार्यक्षेत्रातील आदर्श, नामवंत महिलांच्या कार्य ,कर्तृत्वाचे दाखले देऊन आपल्या सूत्रसंचालनानी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सदर संस्कार समारंभ यशस्वी करण्याकरिता सौ.राजमुद्रा कदम, कु. संघमित्रा कदम, कु. संघराज कदम आणि सामाजिक कार्यकर्ते सन्मा. सुरेश जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.

Author: Sandesh Kadam
संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक