महामार्गावरील मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
👉 गुरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
👉 ग्रामस्थ व वाहनचालकांच्या सुरक्षिततेची हमी प्रशासनाने घ्यावी.
👉 हातीवले ते जैतापूर रोडवरसुद्धा डोंगरतीठा, चिरेखन स्टॉपवरही गुरांचा मोठ्या प्रमाणात वावर
✍️राजू सागवेकर | राजापूर
मुंबई–गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यात वाटूळ ते खारेपाटणदरम्यान रस्त्यावर मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरू असून त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये वाहनांचे नुकसान तर होतेच, पण प्रवासी तसेच गुरे देखील जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत असून सोमवारी हातिवले टोल नाक्यावर स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, रिक्षा संघटना पदाधिकारी व वाहन चालकांनी एकत्रित येत तीव्र आंदोलन छेडले.
हातिवले टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान महामार्ग अधिकारी व राजापूर पोलीसांना निवेदन देण्यात आले. मोकाट गुरांचा बंदोबस्त न झाल्यास मोठे व उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
हातिवले टोल नाका, राजापूर एसटी डेपोसमोरील पूल, ओणी, वाटूळ, पन्हळे टाकेवाडी आदी ठिकाणी गुरांचा घोळका रस्त्यावर बसलेला दिसतो. या कारणामुळे वाहन चालकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबधित विभागांनी उपाययोजना केल्या नाहीत, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.
गुरांना मोकाट सोडणाऱ्या गुरे मालकांवर कठोर कारवाई करावी, फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. निवेदन स्वीकारताना महामार्ग विभागाचे अधिकारी श्री. कुमावत व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. तसेच गावातील पोलीस पाटील व सरपंच यांनी गुरे मालकांना याबाबत सूचना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.
या आंदोलनात अशफाक हाजू, दिपक बेंद्रे, अरविंद लांजेकर, संदीप राऊत, प्रतीक सप्रे, प्रणोती भोसले (सरपंच कोदवली), नाना गोटम (सरपंच हातिवले) यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील, रिक्षा चालक–मालक संघटना पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर आता मंगळवारी आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्या समोर मांडला जाणार असल्याचे अरविंद लांजेकर यांनी सांगितले.















