निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात इसवलीतील ग्रामस्थांचे आंदोलन!
उपोषणाच्या भूमिकेत उमेश कदम व सचिन मेस्त्री; ठेकेदार- अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
लांजा (जितेंद्र चव्हाण):
लांजा तालुक्यातील इसवली मठाचा पऱ्या ते सतीचा उंबर या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम अवघ्या दोन महिन्यांत उखडल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत संबंधित ठेकेदार तसेच दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ग्रामस्थ उमेश कदम यांनी 2 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या आंदोलनाला इसवलीचे माजी सरपंच सचिन मेस्त्री यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
ग्रामस्थ उमेश कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात आले होते; मात्र दीड ते दोन महिन्यांतच खड्डे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ठेकेदारास नोटीस बजावून सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. तथापि, रस्त्याची गुणवत्ता अजूनही अत्यंत निकृष्ट असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कदम यांनी मागणी केली आहे की, संबंधित ठेकेदारावर कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई व्हावी, तसेच काम योग्य असल्याचे दाखले देणाऱ्या जि.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यांची नावे सेवा पुस्तकात नोंदवावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
इसवलीतील ग्रामस्थांच्या या उपोषणामुळे ठेकेदार व जि.प. बांधकाम विभागावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🔖 हॅशटॅग्स
#इसवली #लांजा #रस्त्याचेकाम #उपोषण #उमेशकदम #सचिनमेस्त्री #RatnagiriNews #लांजान्यूज #रत्नागिरीवार्ताहर















