रत्नागिरी तालुक्यात महसूल कार्यालयातील भीती निर्माण करणारा बोर्ड RTI कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाने हटवला
रत्नागिरी, दि. ७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) – निलेश रहाटे
रत्नागिरी तालुक्यातील वाटद ग्राम महसूल कार्यालय (तलाठी कार्यालय) येथे भारतीय दंड विधानातील (IPC) काही कलमांचा उल्लेख असलेला बोर्ड नागरिकांसमोर लावण्यात आला होता. या बोर्डावर नमूद करण्यात आलेली कलमे पाहून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संपर्क प्रमुख श्री निलेश रहाटे तसेच पत्रकार यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यावर त्यांनी त्वरित कार्यालयाला भेट देऊन तपासणी केली. त्यानंतर माहिती अधिकार कायद्यान्वये (RTI) मागवलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचा बोर्ड लावण्यासाठी कोणतेही शासन परिपत्रक, आदेश किंवा निर्देश उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.
या उघडकीनंतर संबंधित तलाठी कार्यालयाने तो बोर्ड तात्काळ काढून टाकला. माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या मते, “शासकीय कार्यालय हे नागरिकांसाठी सेवा देण्याचे केंद्र आहे. नागरिकांना कायद्याच्या नावाखाली भीती दाखवण्याचा अधिकार कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. अशा बोर्डांमुळे लोकांमध्ये प्रशासनाबद्दल अविश्वास निर्माण होतो,” असे त्यांनी सांगितले.
सदर प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अशा स्वरूपाचे बोर्ड लावण्यात आले आहेत का, याची तपासणी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे याबाबत सविस्तर चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
👉 असे कोणतेही IPC कलमाचे किंवा दंडविधान दाखवणारे बोर्ड इतर शासकीय कार्यालयांमध्ये दिसल्यास, संबंधित कार्यालय प्रमुखावर योग्य ती चौकशी करून शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही महासंघाकडून करण्यात येणार आहे.















