गुहागर तालुक्यात मच्छीमार बांधव संकटात; अवकाळी पावसाने मच्छीमारी ठप्प – जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्थिक मदतीची मागणी
रत्नागिरी (प्रतिनिधी) –
गुहागर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि समुद्रातील तीव्र वादळामुळे किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांवर आर्थिक संकट कोसळले आहे. उपासमारीची वेळ ओढवलेल्या या कुटुंबांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवस्वराज्य शेतकरी संघाचे तालुका प्रमुख आनंद भोजने यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पडवे, कुडली, नवानगर, हेदवी, साखरेकर आणि वेळणेश्वर या किनाऱ्यांवरील मच्छीमार गेल्या अनेक वर्षांपासून मच्छीमारीवर उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून समुद्रात सतत निर्माण होणाऱ्या वादळी परिस्थितीमुळे मच्छीमारी करणे अशक्य झाले आहे. परिणामी या कुटुंबांचे उत्पन्न पूर्णतः बंद झाले असून अनेकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
अनेक मच्छीमारांनी आपल्या बोटी आणि जाळीच्या देखभालीसाठी तसेच व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत मच्छीमारी ठप्प झाल्याने त्यांना कर्जफेड करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पुढाकार घेऊन या मच्छीमारांना आर्थिक सहाय्य आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त म्हणून भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अन्यथा या न्याय्य मागणीसाठी संघाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा भोजने यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, मत्स्य विभाग अधिकारी रत्नागिरी आणि तहसीलदार गुहागर यांनाही पाठविण्यात आली आहे.
–















