📰 जयगड बंदरातून काजू निर्यात वाढविण्यासाठी प्रक्रिया गतीने पूर्ण कराव्यात : नितेश राणे
काजू उत्पादकांना थेट लाभ – मंत्रालयात जयगड बंदर काजू निर्यात आढावा बैठक
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत.
जयगड व रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात सुलभ व्हावी यासाठी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री राणे यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपकुमार, तसेच पणन मंडळ, एफएसएसआय, रेल्वे, स्मार्ट व मॅग्नेट आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, “जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात झाल्यास त्याचा फायदा थेट काजू उत्पादक शेतकऱ्यांना होईल. निर्यातीसाठी लागणाऱ्या परवानग्या व प्रशासकीय प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यात याव्यात.”
बैठकीदरम्यान विविध विभागांकडील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि निर्यात प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.















