सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुस्लिम समाजाचा जन आक्रोश!
जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या सदभाव मंचचा मोर्च्यात सहभाग
ओरोस (सिंधुदुर्ग): जिल्ह्यात वाढत्या असंवैधानिक आणि अन्याय्य घटनांविरोधात तसेच बांदा येथील तरुण आफताब कमरुद्दीन शेख आत्महत्या प्रकरणी न्याय आणि शांततेसाठी सोमवारी (१० नोव्हेंबर २०२५) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर सर्वधर्मीय धडक मोर्चा काढण्यात आला. सावंतवाडी येथील ‘आम्ही भारतीय’ या पुरोगामी संघटनेने आयोजित केलेल्या या मोर्च्यात सिंधुदुर्गातील मुस्लिम बांधवांसह विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. संपूर्ण मोर्चा संविधानसम्मत, शिस्तबद्ध आणि शांततामय पद्धतीने पार पडला.
✅ आफताब शेख प्रकरणी न्यायाची मागणी
अलीकडेच बांदा येथील तरुण आफताब कमरुद्दीन शेख याने झालेल्या कथित छळ, व्यावसायिक अडथळे आणि अन्यायामुळे आत्महत्या केली. या घटनेमुळे मुस्लिम समाजासह सर्व संवेदनशील नागरिकांमध्ये तीव्र संताप व वेदना व्यक्त होत असून न्यायाची मागणी तीव्र झाली आहे. “संविधानातील मूल्यांचा सन्मान, शांती, बंधुभाव, एकात्मता सुरक्षित ठेवण्यासाठीच हा मोर्चा आहे,” असे आयोजकांनी सांगितले.
✅ “आम्ही कमी पडलो, त्याबद्दल कुटुंबियांची माफी” – कमलताई परुळेकर
ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर म्हणाल्या,
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजावर कट्टर हिंदुत्ववादी शक्तींनी अन्याय सुरू केला आहे, हे आम्हाला मान्य नाही. आफताब प्रकरणात ‘आम्ही भारतीय’ म्हणून आपण कमी पडलो, त्यामुळे त्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. त्याबद्दल आम्ही त्याच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागतो.”
✅ सदभाव मंचचा सहभाग – चौकशी समितीही उपस्थित
जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या सदभाव मंचने या मोर्च्यात सक्रीय सहभाग घेतला. आफताब प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी समिती सावंतवाडीला आली होती. समितीतील सदस्यही मोर्चात सहभागी झाले.
✅ “जर घटना थांबल्या नाहीत, तर मोठे जन आंदोलन” – इब्राहिम खान
दलित व अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचारांबाबत राज्यभरातील आकडेवारी सादर करत समन्वयक इब्राहिम खान म्हणाले,
“आपण सर्वांनी एकत्र राहून अशा घटनांना आळा घालायलाच हवा. जर अत्याचार थांबले नाहीत तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे केले जाईल.”
✅ “इथे धर्मासाठी नाही, भारतीय म्हणून जमलो आहोत”
मोर्च्यात सहभागी एजाज नाईक व सहकाऱ्यांनी सांगितले,
“हा मोर्चा मुसलमानांचा नसून भारतीयांचा आहे. सिंधुदुर्गातील सामाजिक सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न कोणीही करू देणार नाही. आम्ही एकत्र आलो आहोत, कारण संविधान हा आमचा धर्म आहे.”
मोर्चादरम्यान नागरिकांनी शांतता, बंधुभाव, न्याय, संविधान जिंदाबाद यांसारख्या घोषणांद्वारे आपला निषेध आणि एकता व्यक्त केली.
—














