शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी दिला जल संवर्धनाचा संदेश..!
सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बांधले वनराई बंधारे
आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, या विद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांकडून दहिवलीमधील कराडकरवाडी येथील ओढ्यावर वनराई बंधारे बांधण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनानुसार सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिवसाचे औचित्य साधून चिपळूण पंचायत समिती व कृषी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.जलसंधारणाचे महत्त्व दर्शवत उन्हाळ्यामध्ये आसपासच्या परिसरातील कमी होणारी पाणी पातळी व त्यांचा शेतीवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेवुन विद्यार्थ्यांनी हे वनराई बंधारे बांधत उपस्थित सर्व ग्रामस्थ यांना महत्वपूर्ण संदेश दिला.यासाठी दहिवली ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र कराडकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य केले. याप्रंगी चिपळूण पंचायत समितीचे कृषि अधिकारी भिमराव पाटील व अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य करत मार्गदर्शन केले.या वेळी प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील,सरपंच वैष्णवी लाड,वाडी प्रमुख कृष्णा कुंभार,माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश कदम,ग्रामसेवक दिक्षा खांबे,राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.निशिकांत पाकळे, प्रा.महेश घाणेकर व अंगणवाडी सेवीका ई.उपस्थित होते.या उपक्रमाबद्दल दहिवली गावच्या ग्रामस्थांनी महाविद्यालय व चिपळूण पंचायत समितेचे आभार मानले.














