आदिशक्ती अभियान राबवणेबाबत साटवली ग्रामपंचायतीत विशेष सभा उत्साहात संपन्न
ग्राम स्तर समिती मार्फत या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
लांजा, प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण
राज्यातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियान अंमलबजावणीच्या अनुषंगाने साटवली ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामस्उतर समिती ची सभा उ त्साहात पार पडली. शासन निर्णयानुसार ग्रामस्तरावर आदिशक्ती समिती स्थापन करून अभियान प्रभावीपणे राबवण्याबाबत या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता साटवली ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्तर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शासन परिपत्रकाचे वाचन करून त्यानुसार विविध उपक्रम राबवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. साटवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाडी-वस्तीमध्ये जाऊन जनजागृती करणे, विविध शिबिरे (कॅम्प) आयोजित करणे तसेच शासन परिपत्रकानुसार समितीला दिलेल्या अधिकारांनुसार उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला.
यावेळी शासन परिपत्रकाचे वाचन व मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी केले. सभा ग्रामस्तर समिती अध्यक्ष श्रीम. शबाना मुनीर इस्साफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सरपंच श्री. दत्ताराम सावंत, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण, सचिव श्रीम. संजना संतोष बाकाळकर, पुरुष प्रतिनिधी जहीर कोंडकरी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रवीण ठाकूरदेसाई, पोलीस पाटील सदानंद किल्लेकर, अंगणवाडी सेविका श्रीम. दर्शना तरळ, श्रीम. बाणे व श्रीम. बरमारे उपस्थित होते.
सभेमध्ये महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय क्र. आदिपु/२०२५/प्र.क्र.१५/का-१० (दि. २२ मे २०२५) तसेच संबंधित इतर शासन निर्णयांचे वाचन करण्यात आले. सन २०२५–२६ पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यास मान्यता देण्यात आली असून महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यावर या अभियानाचा भर आहे.
या अभियानांतर्गत महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, उपक्रम व कार्यक्रमांची प्रभावी जनजागृती करण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामस्तर समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
—
आदिशक्ती अभियानाचे प्रमुख उद्देश
महिलांच्या आरोग्य समस्या संवेदनशीलपणे हाताळणे
कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे
बालविवाह रोखणे व मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवणे
महिला व बालकांवरील हिंसाचारास प्रतिबंध
महिला नेतृत्व सक्षम करून पंचायतराज व्यवस्थेत सहभाग वाढवणे
शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
—















